Nitin Gadkari: देशात पार पडलेल्या 5 राज्यांच्या निवडणुकीत भाजपाला अभूतपूर्व यश मिळालं. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात आपल्याला जो विजय प्राप्त झाला आहे. हा विजय आता इथेच थांबणार नाही. ही विजयाची पताका महाराष्ट्रातही लागणार. एक दिवस महाराष्ट्रातही आपला भगवान फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केला आहे. देशातील चार राज्यात भाजपने मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर आज नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस याचे नागपूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. यानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते. गडकरी म्हणाले आहेत की, ''5 राज्याच्या निवडणुकीच्या निकालाचं वैशिष्ट म्हणजे जात, पात धर्म, भाषा यात न पडता जनतेने आपल्या भविष्यासाठी भारतीय जनता पक्षाला मतदान केले.'' 


आमच्या पराभवासाठी विरोधक देव पाण्यात घालून बसले होते, फडणवीस यांचा हल्लाबोल


यावेळी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल म्हणाले आहेत की, ''पाच राज्यांच्या निवडणुकीत आपचे विरोधक देव पाण्यात घालून बसले होते. ते म्हणत होते आता भाजपची चलती आहे, मात्र 10 तारखेला एकदा मतमोजणी होऊद्या हळूहळू भाजपचा प्रभाव कमी होईल. मात्र निकाल लागला आणि त्याचं उत्तर प्रदेश गेलं, याचं गोवा गेलं आणि याचं स्वप्न, स्वप्नच राहिलं.''


कार्यकर्त्यांना संबोधित करताना फडणवीस म्हणाले आहेत की, ''विरोधी पक्षांची स्वप्ने ही मुंगेरीलालचे हसीन स्वप्ने आहेत, कारण काँग्रेस आणि हे सर्व पक्ष जनतेपासून तुटले आहेत.'' फडणवीस पुढे म्हणाले, ज्यावेळी गोव्यामध्ये रणभेदी गर्जना करून शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष आले, तिथे युती केली आणि सांगितलं आम्हीच निवडणूक येणार. त्यावेळी मी पत्रकारांशी बोलताना म्हणालो होऊ की, गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची लढाई आमच्याशी नसून नोटाशी आहे.'' यावेळी शिवसेना-राष्ट्रवादीला टोला लगावत ते म्हणाले आहेत की, ''गोव्यात त्यांनी नोटापेक्षा अधिक मते मिळवली असती, तरी ते लढाई जिंकले असते. मात्र दोन्ही पक्ष मिळून ही त्यांना नोटापेक्षा कमी मते मिळाली.''