मुंबई : पुरोगामी महाराष्ट्रात जातपात मानली जात नाही अशी चर्चा राजकीय व्यासपीठावर नेत्यांकडून सातत्याने केली जाते. मात्र अनेकदा एखाद्या जातीच्या मेळाव्यात मात्र त्या नेत्यांना आवर्जून एखादी जात आठवते. राज्याचे मंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनाही तशीच मुख्यमंत्र्यांची जात आठवली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे ब्राह्मण आहेत म्हणून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला गेला खळबळजनक असं वक्तव्य त्यांनी केलं. रायगड जिल्ह्यातील पेण येथे आयोजित राष्ट्रीय आगरी अध्यात्मिक संमेलनात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

जात या मुद्द्याला हात घातलाना गणेश नाईकांनी हे वक्तव्य केलं. गणेश नाईक म्हणाले की, "कधीकधी जात ही माणसाला शाप ठरते तर कधी ती वरदान ठरते. देवेंद्र फडणवीस हे चुतुरस्त नेतृत्व आहे. त्यांनी सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. तरी देखील ते ब्राह्मण आहेत म्हणून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला गेला."

गणेश नाईकांचा रोख कुणाकडे? 

राष्ट्रीय आगरी अध्यात्मिक संमेलनात बोलताना गणेश नाईकांनी हे वक्तव्य केलं. असं असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नेमकं कुणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला हे मात्र त्यांनी स्पष्ट केलं नाही. गणेश नाईकांचा रोख हा एखाद्या राजकीय नेत्याकडे, पक्षाकडे आहे की एखाद्या जातसमूहाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याकडे आहे हे मात्र स्पष्ट झालं नाही. 

अर्थकारणाशिवाय काही चालत नाही

आजच्‍या राजकारणात अर्थकारणाशिवाय काही चालत नाही. तुम्‍ही स्‍वच्‍छ विचारसरणीचे असाल तर लोक तुम्‍हाला निवडून देतील याची गॅरंटी नाही असं वक्तव्य गणेश नाईक यांनी केलं. तुमचं मन स्वच्छ असेल, तर मानसिक स्थिरता राहील, मग शारिरीक स्थिरता मिळते. त्‍यातून समाजकार्य होतं, मग अर्थकारण होतं आणि आजच्‍या राजकारणात अर्थकारणाशिवाय काहीच चालत नाही असं गणेश नाईक यावेळी म्‍हणाले. गणेश नाईकांच्या या वक्तव्याचीही जोरदार चर्चा रंगली आहे.

ही बातमी वाचा: