Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) पुन्हा एकदा रणशिंग फुंकले आहे. 30 मे पासून मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत. मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे बैठक बोलावली होते. यावेळी समर्थकांना संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आपण अडीच-तीन वर्षापासून लढत आहोत. समाजाच्या पदरात काय पडले? जून महिन्यात ऍडमिशन आहेत. 58 लाख नोंदी निघाल्या आहेत. सरकार जळतंय, मराठा समाजाला मोठं होऊ द्यायचं नाही ही सरकारची भूमिका आहे. सत्तेशिवाय नाही तर मराठ्यांशिवाय शहाणपण चालत नाही. आपल्या समाजाचा एवढा द्वेष का? भाजपमधल्या मराठ्यांच्या लेकीबाळीला आरक्षण लागणार नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis: फडणवीस, तुम्हाला मंत्री मराठ्यांनीच केलंय
आपल्याकडे रुपया नाही, पैशावाले आपल्यात येत नाहीत. मी प्रामाणिक आहे. आपल्याला वारंवार लढावं लागणार आहे. मुंबई तुम्ही विचाराने जिवंत केली. मुंबईतील लोक आम्हाला पुन्हा येणार का? म्हणून विचारतात. आता आंदोलन असं करायचं की पुन्हा फडणवीसांना चारी दिशेला काही दिसले नाही पाहिजे. नुसते मराठेच दिसले पाहिजे. मी फडणवीसांना दोष देत नाही. तुम्ही हैदराबादचा GR काढला पण तुम्ही का रोखले? फडणवीस तुम्हाला मंत्री मराठ्यांनीच केलंय. अधिकारी प्रमाणपत्र देत नाहीत, त्याला फडणवीस साहेबच जबाबदार आहेत. फडणवीस साहेबांनी विधानसभेत एक भाषण केलं होतं. मंत्र्यांना किंमत नाही, मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा आहेत. याचा अर्थ तुम्हीच प्रमाणपत्र रोखले आहे, असा आरोप देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला.
Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis: फडणवीसांनी मराठवाड्यातील मराठ्यांना प्रमाणपत्रासाठी रोखू नये
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, फडणवीस साहेब, या गोरगरिबांची मने जिंका. तुमच्या 50 पिढ्या आल्या तरी मी मराठ्यांना धक्का लावू देणार नाही. फडणवीसांनी मराठवाड्यातील मराठ्यांना प्रमाणपत्रासाठी रोखू नये. आंदोलनाच्या तारखेच्या आता प्रमाणपत्र द्या. 58 लाख नोंदी सापडल्या त्याचे सर्व प्रमाणपत्र द्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी अभियान घेऊन प्रमाणपत्र वाटले. तसेच फडणवीसांनी करावे. शिंदे साहेबांनी जसे अभियान घेतले तसे तुम्हीही घ्या, असे आवाहन देखील त्यांनी केले. सातारा संस्थानचा GR तुम्ही का काढला नाही. अखंड महाराष्ट्र आमचा आहे. आम्ही आठ महिने दम खाल्ला. मी आता वेळ देऊ शकत नाही. सातारा, कोल्हापूर, औंध संस्थानाचा GR काढून त्याची अंमलबजावणी करा. ओबीसींना कसा एका GR दिवसात काढला, असे देखील त्यांनी म्हटले.
Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis: नाहीतर भयानक आंदोलन होईल
एका मंत्र्याने माझ्या विरोधात बोलण्यासाठी 2-2 कोटी रुपये दिले. मला माहिती कळाली. 16 संघटनांना पैसे दिले. त्यातील एक व्यक्ती इमानदार निघाला त्याने मला सांगितले. काही संघटनांची प्रेस ठरली होती. त्याचे पुढे काय झाले हे मला माहिती नाही, असा आरोप देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. तर समाजाने खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. तसेच, आंदोलनाच्या तारखेच्या आत सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, नाहीतर भयानक आंदोलन होईल, असा इशारा देखील त्यांनी दिला.
आणखी वाचा
