Exit Poll Result 2024 : लोकसभा निवडणूकीत उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि बिहार ही राज्ये अतिशय महत्वाची ठरतात. कारण सर्वांत जास्त जागा असलेल्या उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल अशा राज्यात सर्वांत जास्त मिळवणाऱ्या पक्षाला सत्तेची दारे खुली होतात. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षांने उत्तरप्रदेश, महाराष्ट्रासह अनेक मोठ्या राज्यात यश मिळवलं होतं. त्यामुळे भाजपने 2014 आणि 2019 मध्ये सत्ता मिळवली होती. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला निर्णायक आघाडी मिळू शकते ? एबीपी आणि सी व्होटर्सच्या एक्झिटपोलच्या माध्यमातून जाणून घेऊयात.. '


उत्तरप्रदेशात भाजप मुसंडी मारण्याची शक्यता 


लोकसभा निवडणुकीत सर्वांत महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या उत्तरप्रदेशमध्ये भारतीय जनता पक्ष मुसंडी मारताना दिसतोय. उत्तरप्रदेशात राम मंदिराच्या मुद्दाही महत्वपूर्ण ठरला होता. या राज्यात भाजपला 62 ते 66 जागा मिळू शकतात, असा अंदाज आहे. तर इंडिया आघाडीला उत्तरप्रदेशमध्ये 15 ते 17 जागा मिळू शकतात. त्यामुळे उत्तरप्रदेशमध्ये भाजपची मुसंडीच मारण्याची शक्यता आहे. 


पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि एनडीएमध्ये तगडी फाईट 


पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि भाजपमध्ये तगडी फाईट पाहायला मिळाली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला या राज्यात मोठं यश मिळू शकतं. भाजपला 23 ते 27 जागा मिळू शकतात, तर ममता बॅनर्जींना 13 ते 17 जागांवर विजय मिळू शकतो, असा एक्झिट पोलचा अंदाज आहे.त्यामुळे दक्षिणेतील एका महत्वाच्या राज्यात भाजप मुसंडी मारताना दिसतोय.  


बिहारमध्येही भाजपचा करिश्मा


बिहारमध्येही एनडीएला मोठी आघाडी मिळताना दिसत आहेत. लालू प्रसाद यादव आणि त्यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांनी भाजपसमोर तगडे आव्हान उभे केले होते. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये भाजपला 34 ते 38 जागा मिळू शकतात. तर दुसरीकडे इंडिया आघाडीला 3 ते 5 जागांवर समाधान मानावे लागेल, असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. 


महाराष्ट्रात कोणाला आघाडी ? 


एबीपी आणि सी व्होटर्सच्या एक्झिटपोलनुसार , महाविकास आघाडीला 23 ते 25 जागा मिळू शकतात. तर महायुतीला 22 ते 26 जागा मिळू शकतात, असा अंदाज आहे. महाराष्ट्रात दोन पक्ष फुटल्यानंतर होणारी ही पहिली निवडणूक होती. या निवडणुकीत महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 21, काँग्रेस पक्षाने 17 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागा लढवल्या होत्या. तर दुसरीकडे महायुतीकडून भारतीय जनता पक्षाने 28, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने 15 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 4 जागा लढवल्या होत्या. तर रासपच्या महादेव जानकरांनी परभणीची जागा लढवली होती. 


तामिळनाडूमध्ये कोणाची सरशी ?


सर्वांत जास्त जागा असणाऱ्या राज्यांपैकी तामिळनाडू हे देखील महत्वाचे राज्य ठरणार आहे. एबीपी आणि सी व्होटर्सच्या सर्व्हेनुसार, इंडिया आघाडीला तामिळनाडूमध्ये 37 ते 39 जागा जागा मिळू शकतात. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला म्हणजेच एनडीएला केवळ 2 जागांवर समाधाना मानवे लागू शकते, असा एक्झिटपोलचा अंदाज आहे. 


कर्नाटकमध्ये इंडिया आघाडीला फटका? 


कर्नाटकमध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला फटका बसण्याची शक्यता आहे. कारण कर्नाटकातील 28 जागांपैकी 23 ते 25 जागांवर एनडीएला आघाडी मिळू शकते. तर इंडिया आघाडीला 3 ते 5 जागा मिळू शकतात, असा एक्झिटपोलचा अंदाज आहे. 



Disclaimer : सर्वेक्षणातून समोर आलेले निकष पूर्णपणे लोकांकडून मिळालेल्या उत्तरांवर आधारित आहेत, त्यामुळे यातून एबीपी न्यूज अथवा एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी हे सर्वेक्षण केले आहे. यासाठी देशभरातील विविध राज्यातील लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत. सर्वेक्षणातील त्रुटींचं मार्जिन ऑफ एरर प्लस - मायनस 3 ते प्लस - मायनस 5 टक्के इतके आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


एक्झिट पोलचा शेअर बाजारावर नेमका काय परिणाम पडतो? 20 वर्षांचा इतिहास काय सांगतो?