Maha Vikas Aghadi Seat Sharing : मुंबई : वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आणि महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) चर्चा फिसकटल्यातच जमा आहे की काय, असा प्रश्न निर्माण होतोय. याचं कारण म्हणजे, आपल्या दररोजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज वंचितचा उल्लेख भूतकाळात केला. हे लक्षात आल्यावर संजय राऊतांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत बातमी त्यांच्या तोंडून निघून गेली होती. आम्ही प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना चार जागांचा प्रस्ताव दिला होता. मात्,र त्यांची भूमिका वेगळी आहे, अशा शब्दांत राऊतांनी मविआ आणि वंचितमधील मतमतांराची कल्पना दिली. त्यामुळे वंचितसोबतची महायुतीची चर्चा फिस्कटल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. 


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना वंचित बहुजन आघाडीचा उल्लेख भूतकाळात केला आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब आंबेडकर हे सन्मान नेते आहे. त्यांची अनेक वेळा आमची चर्चा झाली, त्यांनी चार जागेवरती लढावं, त्यांना आम्ही सूचना केल्या आहेत, हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिल्यावर त्यांची वेगळी भूमिका आम्हाला दिसत आहे. तो प्रस्ताव त्यांनी मान्य केला असता, तर आम्हाला आनंद झाला असता."


"या हुकूमशाहीच्या लढायला संविधान वाचवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्यामुळे गती आणि बळ आम्हाला नक्कीच मिळाल असतं. आम्हाला अजून देखील खात्री आहे सर्व प्रमुख नेते एकत्र बसतील आणि पुन्हा बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील. तुमच्या मनात काही नाराजी असेल ती दूर करण्यासाठी आम्हाला यश येईल. वंचित दलित समाज या लढ्यात असायलाच पाहिजे.", असं संजय राऊत म्हणाले. 


बीआरएस आणि वंचित लोकसभेसाठी गाठ बांधणार? 


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीआरएस पुन्हा 'अॅक्शन मोड'वर आली आहे. प्रकाश आंबेडकर आणि के. चंद्रशेखर राव यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे. केसीआर यांचा निरोप घेऊन मराठवाड्यातील भारत राष्ट्र समितीचे नेते कदीर मौलाना अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला गेले आहेत.


महाविकास आघाडीशी सुरू असलेली बोलणी जवळपास फिसकटल्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी आता अन्य पर्याय शोधण्यास सुरूवात केली आहे. प्रकाश आंबेडकर आणि बीआरएस पक्षाचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांच्यात फोनवरून चर्चा झालीये. महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी बीआरएस वंचितसोबत युती करण्यास इच्छुक असल्याचं कळतंय. मराठवाड्यातील बीआरएसचे नेते कदीर मौलाना यांनी आंबेडकरांची अकोल्यात भेट घेतली. कदीर यांच्यामार्फत केसीआर यांनी आंबेडकरांसमोर मैत्रीचा हात पुढे केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी आंबेडकरांना दोन मोठ्या शासकीय कार्यक्रमांना देखील निमंत्रित केलं होतं.