Chandrashekhar Bawankule On Devendra Fadnavis: 'आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे की, या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुढच्या काळात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनीच नेतृत्व केले पाहिजे', असं वक्तव्य भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावरून भाजपमध्ये नाराजी असल्याचं दिसून येत आहे. याआधीही भाजपमधील काही नेत्यांनी फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हायला हवं होत, असं बोलून दाखवलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. एका कार्यक्रमात बोलताना बावनकुळे असं म्हणाले आहेत.  

  


काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?


चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत की, ''पुढच्या काळात मी मुख्यमंत्री झालो पहिजे, असा काही जणांनी उल्लेख येथे केला. पण कर्तृत्ववान अष्टपैलू असे फडणवीस हे माझ्या पाठीशी उभे राहिले. मला त्यांनी उर्जा दिली. आज आपले कर्तव्य आहे की, या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुढच्या काळात फडणवीस यांनीच नेतृत्व करायला हवे. मी जबाबदारीने सांगतो की जात, धर्म पंथाच्या बाहेर जाऊन एक निष्ठावान आणि सक्षम कार्यकर्ते हे फडणवीस आहेत. त्यांच्या  नेतृत्वाला सलामच करायला पाहिजे. यांच्यामुळेच आम्ही. जेव्हा माझे तिकीट कापले तेव्हा वाटले नव्हते की, परत मी आमदार, मंत्री, प्रदेशाध्यक्ष होईल म्हणून पण मला मोदी आणि वरिष्ठ नेत्यांनी संधी दिली.''


स्वतःबद्दल सांगतांना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, 1992 मध्ये मी कुऱ्हाडी गावचा शाखाध्यक्ष होतो आणि कधी वाटलही नव्हते की प्रदेशाध्यक्ष होईल म्हणून. तेव्हा खूप संघर्ष होता, प्रचंड ताणतणाव होता. मला अभिमान आहे की पक्षाने मला आमदार, पालकमंत्रीही केले. आज जगातील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे. 155 देशांनी मोदींचे नेतृत्व स्वीकारले. देशाच्या पंतप्रधानाचा इतिहास बघा, चहावाला होते एका गावात. युगपुरुष होतील असे त्यांचे कर्तृत्व आहे. ते म्हणाले, जगातले 70 टक्के देश म्हातारे होणार. संस्कार, संस्कृती असणारा असा आपला देश, युवापिढीचे नेतृत्व करणार आहे. मला ही जाणीव आहे की मला प्रदेशाध्यक्ष केले म्हणजे माझ्यावर जबाबदारी खूप आहे. 45 प्लस खासदार आम्हाला द्यावे लागतील महाराष्ट्रातून. कोरोना काळात खूप मोठे काम केले, लस आणली. तुमच्या आमच्या तोंडावरचे मास्क काढण्याचे काम मोदींनी केले. मी या दोन महिन्यात महाराष्ट्रात फिरणार आहे. दीड तास मी समाजासाठी राखीव ठेवलाय. ते पुढे म्हणाले, शरद पवारांच्या सिस्टीमला हरवून तडस प्रदेशाध्यक्ष झाले. दहा बारा सुवर्णपदक तडस साहेब आणतील.