Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray: ठाकरे बंधू एकत्र येऊनही मुंबई का जिंकू शकले नाही? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'मराठी माणूस...'
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray: एबीपी माझाच्या ‘आयडियाज ऑफ इंडिया’ कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला.

Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray: एबीपी माझाच्या ‘आयडियाज ऑफ इंडिया’ कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. ठाकरे बंधू एकत्र येऊनही मुंबई महापालिका का जिंकू शकले नाहीत? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भाष्य केले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जो मुंबईचा मराठी माणूस आहे, तो देखील हे पाहतो आणि विचार करतो की त्यांनी काय काम केले आहे. मुंबईतील मराठी माणसांना गेल्या 30 वर्षांत उद्धव ठाकरेंनी काय दिले? काहीही दिलेले नाही. उद्धव ठाकरे हे गेल्या 15 वर्षांत स्वतः मुंबईच्या महापालिकेत लक्ष घालत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मी त्यांना खुले आव्हान दिले होते.
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी मराठी माणसांना काहीही दिलं नाही
उद्धव ठाकरे हे त्यांच्या भाषणात मुंबईच्या विकासाबाबत बोलले तर मी 100 रुपये देईन. त्यानंतर मी माझ्या बक्षीसाची रक्कम 3 हजारांपर्यंत वाढवली, तरीही उद्धव ठाकरे मुंबईच्या विकासाबाबत काहीही बोलले नाहीत. इतकेच नाही तर मी त्यांना आणखी एक खुले आव्हान दिले होते की, मुंबईत तुमचा एक आयकॉनिक प्रकल्प दाखवा. पण उद्धव ठाकरे ते देखील सांगू शकले नाही. त्यामुळे लोकांना हे समजते की एवढ्या वर्षांत मुंबईतील मराठी माणूस मुंबईतून बाहेर गेला. तरी ते मुंबईतील मराठी माणसांसाठी फक्त बोलत राहिले, पण एवढ्या मोठ्या महापालिकेवर त्यांची सत्ता असतानाही उद्धव ठाकरेंनी मराठी माणसांना काहीही दिलं नाही, असे त्यांनी म्हटले.
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: ...म्हणून आम्हाला मराठी माणसांनी मतदान केलं
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मराठी माणसांना साधं घरही उद्धव ठाकरे देऊ शकले नाही. दुसरीकडे लोकांनी हे पाहिलं की आम्ही बीडीडी चाळीचा पुनर्विकास करून लोकांना घरे दिली. तेव्हा लोकांच्या लक्षात आले की लोकांसाठी कोण महत्वाचे आहे. त्यामुळे आम्हाला मुंबईतील मराठी माणसांनीही मतदान केलं आणि आम्ही निवडून आलो, असे म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.
आणखी वाचा
























