जळगाव : इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) इंजिनमध्ये फक्त त्यांच्या परिवारासाठी जागा आहे. सामान्य माणसासाठी नाही. यांच्यासाठी यांचा परिवार दुनिया आहे पण, पंतप्रधान मोदींजीसाठी (PM Narendra Modi) संपूर्ण देश त्यांच्या परिवार आहे आणि त्या परिवारासाठी ते काम करतात. असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला आहे. कडाक्याच्या उन्हात तुम्ही समर्थन देण्यासाठी आले आहात, दोन्ही उमेदवार पाच लाख मतांनी निवडून येतील, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आहे. विरोधक ही निवडणूक ग्रामपंचायत निवडणूक असल्यासारखे वागत आहे. हा देश कोणाच्या हातात द्यायचा, त्याची ही निवडणूक आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात 26 पक्षांची खिचडी आहे. आपल्याकडे मोदींच्या इंजिनवर चालणारी पॉवर फुल गाडी आहे, सबका साथ सबका विकास धोरण ठेऊन काम केले जात आहे, असं फडणवीसांनी सांगितलं. जळगावमध्ये रक्षा खडसे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. 


इंडिया आघाडीत प्रत्येक जण स्वत:ला इंजिन समजतोय


इंडिया आघाडी 26 पक्षांची खिचडी आहे. आपल्या महायुतीच्या गाडीचं मोदीजी हे पावरफुल इंजिन आहेत. आपल्या इंजिनाला सर्वपक्षाच्या बोग्या लागल्या आहेत, ज्यामध्ये सर्व समाजाचे लोक आहेत. इंडिया आघाडीमध्ये प्रत्येक जण स्वत:ला इंजिन समजत आहेत. सगळेच इंजिन स्वतःला समजत आहेत. इंडिया आघाडीत बोग्याचं नाहीत प्रत्येक जण स्वत:ला इंजिन समजतोय. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन, शरद पवार म्हणतात मी इंजिन, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन, स्टॅलिन म्हणतात मी इंजिन, ममता बॅनर्जी म्हणतात मी इंजिन, लालूप्रसाद यादव म्हणतात मी इंजिन. तिथे इंजिनच आहेत. बोगीच नाहीत. इंजिनमध्ये सामान्य माणसाला बसायला जागा नसतो, फक्त चालक बसतो. 


यांचं इंजिन हलतही नाही, डुलतही नाही


इंजिनमधे केवळ चालक बसतो. शरद पवार यांच्याकडे सुप्रिया सुळे यांना जागा आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त आदित्य ठाकरे यांच्यासाठी जागा आहे. यांच्या इंजिनमध्ये फक्त यांच्या परिवारासाठी जागा आहे, सामान्य माणसासाठी नाही. यांच्यासाठी यांचा परिवार दुनिया आहे पण, मोदींजीसाठी संपूर्ण देश त्यांच्या परिवार आहे आणि त्या परिवारासाठी ते काम करतात. म्हणून यांच्या इंजिनची अवस्था अशी आहे, राहुल गांधी इंजिन दिल्लीकडे ओढतात, पवार साहेब बारामतीकडे, उद्धव ठाकरे मुंबईकडे ओढतात, स्टॅलिन दक्षिणेकडे ओढतात. यांचं इंजिन हलतही नाही, डुलतही नाही, एका जागेवर ठप्प पडून आहे, असं म्हणत फडणवीसांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला आहे.


रक्षा खडसेंना मतदान करुन मोदींच्या इंजिनाला ताकद द्या


रक्षा खडसे यांना मतदान केले तर मोदी यांच्या इंजिनाला ताकद मिळेल आणि देशाचा विकास होईल. विरोधक केवळ शिवीगाळ शिवाय काही बोलत नाही, विकासाबाबत बोलत नाहीत. मोदी यांनी मात्र विकासाचं काम केलं. अनेक विकास योजना आणल्या. मोदी म्हणतात, महिला पायावर उभे राहते तेव्हा पूर्ण परिवार पायावर उभा राहतो, असंही फडणवीसांनी सांगितलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


आरशात पाहा, औकात कळेल, 4 जूनला जनता उत्तर देईल; श्रीकांत शिंदेंची आदित्य ठाकरेंवर घणाघाती टीका