Devendra fadanvis : राज ठाकरेंचा मनसे महायुतीमध्ये जाणार का? अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या. मनसे महायुतीसोबत निवडणुका लढवणार का? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. राज ठाकरे मनसेसोबत येतील की नाही हे तुम्हला लवकरच कळेल, आमचे ते चांगले मित्र आहेत, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळ्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. 


राज ठाकरेंसोबतच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत. या महायुतीत मनसे कुठे असेल? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना लोकमतच्या कार्यक्रमात विचारण्यात आला. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आता मनसे कुठे असेल हे तर आपल्याला वेळ सांगेल. आमची राज ठाकरे यांच्यासोबत चांगली मैत्री आहे. आमच्या भेटीगाठी होतात. आम्ही अनेक विषयांवर गप्पा मारतो. काही चांगल्या सूचना ते अनेकवेळा करतात. तर कधी आमच्यावर टीका देखील करतात. सोबत काम करू की नाही हे आता लवकरच आपल्याला समजेल. अजून असा काही निर्णय घेतलेला नाही."  


राज ठाकरे मनसे तुमच्यासोबत असणार का?


राज ठाकरे यांची मनसे महायुतीमध्ये येणार की नाही हे तुम्हला लवकरच कळेल. राज ठाकरे आमचे चांगले मित्र आहेत. ते आमच्यावर टीकासुद्धा करतात पण ते सोबत येतील का? हे लवकरच कळेल. उद्धव ठाकरे यांनी आता सोबत येण्याची दार बंद केली आहेत, आमची मनं दुखावली आहेत. ज्या प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोलतात, खालच्या पातळीवर बोलतात. त्यामुळे मनं दुखावली आहेत. जिथे मनं दुखावतात तिथे युती होणे शक्य नाही. पॉलिटिकली डीफरन्स असतील तर युती होऊ शकते पण येथे पण आमची मनं दुखावली आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.  


अजित पवार यांच्यासोबत काही तासांचं सरकार तुम्ही स्थापन केलं. काय झालं होत?


शरद पवार यांच्यासोबत चर्चा होऊनच बैठक होऊनचं त्यावेळी अजित पवार आणि मी तयारी करून शपथ घेतली, आणि ऐनवेळी शरद पवार मागे गेले. शरद पवार यांनी विश्वासघात केला. पण अजित पवार यांना हे पटलं नव्हतं. शरद पवार यांना विश्वासात घेऊनच निर्णय झाला होता.मला अनेक लोकांना एक्सपोज करायचा नाहीये.यावर २-४ वर्षांत पुस्तक लिहिलं मग स्पष्ट होईल.आतले घटनाक्रम सांगेल. अजित पवार यांना तोंडघाशी पाडण्याचा काम त्यावेळी या सगळ्यांनी केलं होतं, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे आमदार आमच्यासोबत त्यावेळीच यायला तयार होते, ते मला स्वतः बोलायचे. उद्धव ठाकरे यांनी जे जे काही केलं, जी वागणूक नेत्यांना दिली त्यामुळे ते लोक आमच्यासोबत शिवसेना आमदार आले. आम्हाला काही करावं लागलं नाही. जसा शिवसेनेत झालं तसं अजित पवार आणि त्यांच्या आमदारांचा सफ़ोकेशन त्यांच्या पक्षात होतं. पक्षात अजित पवार यांना नंबर 2  वरच राहावं लागलं असतं, कधीच शरद पवार यांनी त्यांना नेतृत्व दिलं नसतं. उमेदवार आता निवडणुकीत इकडे तिकडे जाऊ शकतो. पण सगळे उमेदवार त्या त्या त्यांच्या पक्षावर त्यांच्या चिन्हवर निवडणूक लढावतील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.