Nana Patole on CM Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे भ्रष्टाचारातून उभे केलेल्या पैशातून टिझर दाखवण्यात गुंतल्याचे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जनतेशी काहीही देणंघेणं नसल्याचेही पटोले म्हणाले. महाराष्ट्रातील जनता आमच्यासाठी केंद्रबिंदू असल्याचे मत पटोले यांनी व्यक्त केले. 


महाराष्ट्रातील जनता आमच्यासाठी केंद्रबिंदू 


राज्यातील मुख्यमंत्र्याला महाराष्ट्रातील जनतेशी काही घेणं देणं नाही, अशा पद्धतीनं ते वागत असल्याचे नाना पटोले म्हणाले. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत आहेत. बेरोजगार तरुण आत्महत्या करत आहेत. महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. महाराष्ट्रात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. या सगळ्या विषयाची चिंता न करता मुख्यमंत्री भ्रष्टाचारातून उभे केलेल्या पैशातून टिझर दाखवण्यात गुंतल्याचे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले. अशा मानसिकतेच्या लोकांबाबत काय प्रतिक्रिया द्यावी हाच एक मोठा चिंतेचा विषय असल्याचे पटोले म्हणाले. त्यामुळं हे जे काही दसरा मेळावा आणि या ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत याच्यावर काय प्रतिक्रिया द्यावी, महाराष्ट्रातील जनता आमच्यासाठी केंद्रबिंदू असल्याचे पटोले म्हणाले. 


 दसरा मेळाव्यासंदर्भात मला प्रतिक्रिया द्यावं असं वाटतं नाही


काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील शेतकरी असेल, गरीब असेल, शिकलेली मुलं मुली असेल त्यांच्याबद्दलची चिंता करून त्यांना न्याय देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. त्यामुळं दसरा मेळाव्यासंदर्भात मला प्रतिक्रिया द्यावं असं वाटतं नाही, असा निशाणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या टिझरवर साधला.