Chandrakant Patil on Raj Thackeray : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत उपोषण (Maratha Reservation Mumbai Protest) सुरू केले आहे. या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. महाराष्ट्रभरातून लाखो मराठा आंदोलक गाड्यांसह मुंबईत दाखल झाल्यामुळे दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे मराठा आंदोलन चिघळताना दिसत आहे. याचदरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. "मराठा मोर्चा आणि आरक्षणाबद्दल सर्व स्पष्टीकरण एकनाथ शिंदेच (Eknath Shinde) देऊ शकतात," असे त्यांनी म्हटले आहे. आता यावर भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

Continues below advertisement


मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यात : चंद्रकांत पाटील


चंद्रकांत पाटील म्हणाले की, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत कोणतेही खोटे आश्वासन दिले नाही. जे लिहून दिलं होतं त्याच्या आधारे मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या विषयावर आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर जे जे तोडगे काढता आले ते काढण्यात आले. पण नाईलाजाला कोणताच  इलाज नसतो, असे त्यांनी म्हटले आहे. 


नेमकं काय म्हणाले होते राज ठाकरे? 


राज ठाकरे यांना माध्यमांनी मुंबईतील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत प्रश्न विचारला. यावर राज ठाकरे म्हणाले की, मराठा मोर्चा आणि आरक्षणाबाबत सर्व गोष्टींची उत्तरं एकनाथ शिंदेच देऊ शकतील. मनोज जरांगे परत का आले याचंही उत्तर एकनाथ शिंदेंना विचारा. जेव्हा एकनाथ शिंदे येतील तेव्हा त्यांना विचारा. मुंबईकरांना खूप त्रास होतोय,  एकनाथ शिंदे मागच्यावेळी नवी मुंबईत गेले होते, त्यावेळी त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आले, या प्रश्नांची सगळी उत्तरं एकनाथ शिंदे देतील, असं म्हणत राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना एकप्रकारे कात्रीतचं पकडल्याचे पाहायला मिळाले होते. 


मुंबईकरांचे हाल होताय, त्यांचा काय दोष : चंद्रकांत पाटील


दरम्यान, सरसकट मराठ्यांना कुणबी करा अशी कायद्यात तरतूद नाही. सर्वोच्च न्यायालयाने देखील एखाद्या जातीचा कुणबीमध्ये समावेश करता येणार नसल्याचे म्हटले आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी केल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही, असे कुणी म्हणत असेल तर लोकशाहीमध्ये काहीही म्हणायला आणि काहीही करायला परवानगी आहे. पण आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय जर मुंबई सोडणार नाही असे म्हटले जात असेल तर  तुम्हाला सरकार जबरदस्तीने अटक ही करणार नाही. पण 24 तास धावणाऱ्या मुंबईला विस्कळीत करता येणार नाही, असे न्यायालयाने ही म्हटलं आहे. नवी मुंबईत आंदोलन करण्याचा प्रस्ताव दिला होता मात्र तो ऐकला गेला नाही. मात्र आता आझाद मैदानात एक दिवस होऊन दुसऱ्या दिवसाचे आंदोलन सुरु आहे. पण आता व्यावहारिक मागण्यावर बोलून हा विषय संपवावा लागेल. यामध्ये सर्वसामान्य मुंबईकरांचे हाल होत आहे. यात, त्यांचा काय दोष आहे. असे देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. 


मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)


1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, 


2. हैदराबाद गॅझेटियर लागू करा...सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे.


3. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या...सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या.


4. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.


5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.



आणखी वाचा 


Manoj Jarange And Shinde Samiti मोठी बातमी: हैदराबाद गॅझेट लागू करण्याला सरकारची तत्वत: मंजुरी, न्यायमूर्ती शिंदे समितीचा मनोज जरांगेंना शब्द