नागपूर: कोणाचाही मुलाहिजा न बाळगता रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले भाजपचे नेते नितीन गडकरी हे कायमच चर्चेत असतात. आतादेखील ते अशाच एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. राज्यात शिवसेना-भाजप (BJP) युतीचे सरकार असताना सरकारी अधिकारी काम करत नव्हते. त्यावेळी आपण अधिकाऱ्यांना काम करुन घेण्यासाठी धमकावले होते. मी पूर्वी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा मी चळवळीत (Naxal Movement) गेलो तर तुम्हाला गोळ्या घालेन, असा सज्जड दम आपण सरकारी अधिकाऱ्यांना भरल्याचा किस्सा नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितला. ते रविवारी नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. 


यावेळी नितीन गडकरी यांनी मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाचा एक किस्सा उपस्थितांना सांगितला. त्यांनी म्हटले की,  त्यावेळी डॉ. अलेक्झांडर महाराष्ट्राचे राज्यपाल होते. त्यावेळी मी राजदूत दुचाकीवरुन मेळघाटातील गावांमध्ये फिरलो. तेथील रस्त्यांची परिस्थिती खराब होती. तरीही वनखात्याचे अधिकारी रस्ते बांधायचे काम करुन देत नव्हते. याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सुनावले. एवढी लहान मुलं कुपोषणाने मरत आहेत, तुम्हाला काही वाटत कसे नाही? तुम्ही रस्ते बांधायला परवानगी का देत नाही?, असे मनोहर जोशींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना विचारले. त्यानंतर मी मनोहर जोशी यांना म्हटले की, तुम्ही हा विषय माझ्यावर सोडा, मी बघतो काय करायचंय ते. त्यावेळी मी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की, मी तरुणपणी नक्षलवादी चळवळीत होतो. मी चुकून राजकारणात आलो. परंतु, आता मी पुन्हा नक्षलवादी चळवळीत गेलो तर तुम्हाला गोळ्यांनी फुंकल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर मी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबत जे जे केलंय, ते इकडे सांगू शकणार नाही. या सगळ्यानंतर मेळघाटातील रस्त्यांचे काम पूर्ण झाले, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. 


सरकारमध्ये चांगल्या माणसाला सन्मान नाही: नितीन गडकरी


सरकारी प्रक्रियेत एखाद्याला अधिकाऱ्याला शिक्षा करायची असली की ते फार कठीण काम आहे. कारण एखाद्याने ती फाईल दाबून धरली ती फाईल वर जात नाही, असे नितीन गडकरी यांनी म्हटले. यावेळी त्यांनी सरकारची व्याख्याही सांगितले. ते म्हणाले की, चांगल्या माणसाला सन्मान नाही आणि वाईट माणसाला शिक्षा नाही म्हणजे सरकार, असे गडकरी यांनी म्हटले.


आणखी वाचा


लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसचे काही नेते रात्री नितीन गडकरींशी बोलायचे, विकास ठाकरेंचा खळबळजनक दावा