मुंबई : मतांसाठी कुणीतरी मुंबईत मराठी विरूद्ध गुजराती (Marathi Vs Gujarati Dispute) वादाचे राजकारण करतायत, असा वाद कुठेच नाही, मतं इकडे तिकडे राहावे म्हणून कोणीतरी खुसपट काढतंय  असं सांगत मराठी मतं मिळावीत म्हणून गुजराती आणि मराठीमध्ये वाद निर्माण करायचा प्रयत्न सुरू असल्याची टीका केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांनी नाव न घेता महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केली . 


महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ कल्याणमध्ये गुजराती, राजस्थानी समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात कपिल पाटील यांनी मार्गदर्शन केल. यावेळी कपिल पाटील यांनी लोक शांततेने गुण्या गोविंदाने राहतायत, मतदानासाठी अशा प्रकारच्या वक्तव्यांना आळा घातला पाहिजे, मतदान निपक्षपातीपणे शांततेने समाजामध्ये तेढ न निर्माण करता झाला पाहिजे याचे खबरदारी सगळ्यांनी घेतले पाहिजे असे आवाहन केलं.


भिवंडीतून कपिल पाटील विरूद्ध बाळ्या मामा 


भिवंडीतून भाजपचे कपिल पाटील विरूद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्यात लढत होणार आहे. सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांना शरद पवार गटाने उमेदवारी जाहीर केल्याने भिवंडी लोकसभेची यंदाची लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे. भाजपचे कपिल पाटील 2014 आणि 2019 अशा दोन वेळेस भिवंडीतून निवडून आले आहेत. 


कपिल पाटील यांनी भिवंडी तालुक्यातील दिवे अंजुर गावचे सरपंच म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी आपल्या कार्याची छाप पाडली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद अध्यक्ष पदासह जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपदही त्यांनी भुषवलं. 


पुढे 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कपिल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 आणि 2019 मधील भिवंडी लोकसभा मतदार संघातून दणदणीत विजयही त्यांनी संपादित केला. दांडगा जनसंपर्क आणि प्रशासकीय कामाची चांगली ओळख असल्यानं त्यांनी अल्पावधीतच भाजपामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अशातच आता पुन्हा एकदा आगामी लोकसभेसाठी भाजपकडून कपिल पाटील यांना संधी देण्यात आली आहे. अशातच पक्षानं दिलेल्या संधीचं कपिल पाटील पुन्हा एकदा सोनं करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  


ही बातमी वाचा: