Bharat Jodo Yatra: वादळी बर्फवृष्टी दरम्यान सोमवारी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) समारोप झाला. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बर्फवृष्टी होत असताना कार्यकर्त्यांना संबोधित केलं आहे. त्यांचं हे बर्फवृष्टी दरम्यान सुरु असलेलं भाषण पाहून अनेक नेटकऱ्यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी भर पावसात केलेल्या भाषणाची आठवण झाली. समारोप सभेत बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi म्हणाले की, ''येथे तैनात असलेल्या सीआरपीएफ, बीएसएफ आणि लष्कराच्या जवानांना सांगू इच्छितो की मला हिंसा काय असते हे समजतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि आरएसएसचे लोक हे समजू शकत नाहीत. आम्ही इथे चार दिवस फिरलो. भाजपचा कोणताही नेता असा येथे चालणार नाही, याची मी खात्री देतो. जम्मू-काश्मीरचे लोक त्यांना फिरू देणार नाहीत म्हणून नाही, तर ते घाबरले आहेत.'' 


राहुल गांधी म्हणाले की, "जेव्हा मी 14 वर्षांचा होतो आणि शाळेत भूगोलाच्या वर्गात बसलो होतो, तेव्हा माझे एक शिक्षक जवळ आले आणि म्हणाले की तुम्हाला मुख्याध्यापकांनी बोलावले आहे. मी मुख्याध्यापकांकडे पोहोचलो तेव्हा त्यांनी सांगितले की, घरून फोन आला आहे. मी फोन घेतला आणि फोनवर बोललो तेव्हा माझ्या आईसोबत काम करणारी बाई जोरात ओरडली, राहुल... आजीला गोळी लागली आहे.'' याबाबत बोलताना ते पुढे म्हणाल, ''मी हे जे बोलत आहे, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना समजणार नाही. पण काश्मीरचे लोक, आर्मी आणि सीआरपीएफचे लोक ते समजू शकतात. पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या मुलांना काय वाटत असेल. येथे काश्मिरी लोक मारले जातात, तेव्हा काय वाटत असेल, हे मला आणि माझी बहिणीला चांगलं समजतं.'' 






देशाचा पाया असलेली विचारधारा मजबूत करण्यासाठी आम्ही ही यात्रा काढल्याचे राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले. ते म्हणाले, मला माहीत आहे की जर आपण प्रेमाने उभं राहत सर्वांशी प्रेमानं बोललो तर आपण यशस्वी होऊ. आम्ही त्यांच्या विचारसरणीचा पराभव तर करूच, पण ती त्यांच्या मनातून काढूनही टाकू. ते म्हणाले, माझ्याकडे स्वतःचे घर नाही, मी सरकारी घरात राहिलो आहे. घर ही माझ्यासाठी राहण्याची आणि विचार करण्याची पद्धत आहे. ते म्हणाले की, लोक ज्याला काश्मिरियत म्हणतात, त्याला मी माझे घर मानतो. 


संबंधित बातमी: 


Congress Bharat Jodo Yatra: लहानपण देगा देवा... राहुल आणि प्रियंका गांधींनी लुटला बर्फवृष्टीचा आनंद, फोटो व्हायरल