मुंबई : बदलापूर बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर आता या घटनेवरुन चांगलंच राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून बदलापूरच्या घटनेचं राजकारण गेलं जात असून महाविकास आघाडीकडून 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्‍यांनीही विरोधकांनी या घटनेचं राजकारण करु नये, आंदोलनात सहभागी झालेले लोकं कुठून आले, कोण होते, असे प्रश्न उपस्थित केले आहेत. तर, शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. बदलापूरच्या घटनेत राजकारण दिसत असेल तर मुख्यमंत्रीसुद्धा विकृतच, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी बदलापूरच्या घटनेवर सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला होता. त्यावर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घडलेल्या बलात्काराच्या घटनेची माहितीच शेअर केली आहे. तसेच, स्वत:चं तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट, अशी गत उद्धव ठाकरेंची असल्याचंही बावनकुळे यांनी म्हटलं. 


राज्यात सध्या विकृतीचा व्हायरस पसरला आहे.  ठाणे जिल्हा हे मुख्यमंत्री यांचे घरं आहे. हे दुष्कृत्य ते मान्य करताय का? पोलिस ढिम्म आहेत म्हणून जनता पेटून उठली. नाहीतर काय करणार..  मुख्यमंत्री कुठे होते? ते रत्नागिरीमध्ये राख्या बांधत होते... राख्याला तरी जागा ... मुख्यमंत्री यांना बदलापूरला जायचं होतं तर हे रत्नगिरीमध्ये होते जाऊन बसले त्यात गुलाबी जॅकेट सुद्धा होतं , अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यावर, आता चंद्रशेखर बावनकुळे यानी पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे कशाला दिशाभूल करता?, तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात  महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही आठवा, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घडलेल्या बलात्काराच्या घटनेची माहितीच शेअर केली आहे. 


उद्धवजी कशाला दिशाभूल करता?, तुम्ही मुख्यमंत्री होते तेंव्हा हिंगणघाट, भोपर, साकीनाका, नांदेड, पुणे, बीड, सिंधुदुर्ग.. घडले. "आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्ट," अशी गत उद्धव ठाकरे यांची झाली आहे. कोलकत्ता, हाथरस, उनाव येथील घटनांवर तुम्ही बोलता. पण आश्चर्य आहे, तुम्ही ज्यांच्या मांडीवर बसून नैतिकतेच्या गप्पा करता, बदलापूरच्या घटनेआडून राजकारण करता त्या काँग्रेस -राष्ट्रवादीच्या काळात कित्ती भयंकर घडले होते. तेही कारनामे जरा आठवा, जनतेला ऐकवा. तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात  महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही आठवा. जनतेला कळू द्या. आपले झाकून ठेवून कित्ती दिवस जनतेची  दिशाभूल करणार, असा सवाल बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे. 


घटनांची दिली माहिती


22 ऑगस्ट 2013 रोजी, म्हणजे 11 वर्षांपूर्वी,  आजच्याच दिवशी मुंबईतील शक्ती मिलमध्ये प्रेस फोटोग्राफर असलेल्या 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. तेंव्हा सरकार काँग्रेस -राष्ट्रवादीचे होते.


हिंगणघाटमध्ये भर रस्त्यात तरुण प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळले होते.तेव्हा तर उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होते आणि वसुली सम्राट गृहमंत्री होते.


डोंबिवलीच्या भोपरमध्ये 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. 33 आरोपींची नावं समोर आली होती.तेंव्हाही उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि, वसुलीसम्राट गृहमंत्री होते.


मुंबईतील साकीनाका, नांदेड, पुणे, बीड, सिंधुदुर्ग.. येथील सामूहिक बलात्काराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला होता. तेंव्हाही उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि, वसुलीसम्राट गृहमंत्री होते.


या सर्वच घटनांचा आम्ही निषेध करतो, आरोपीना कडक शिक्षा व्हावी, यासाठी पुढाकार घेतो. पण तुम्ही 'उठता बसता' राजकारण करता. उद्धवजी, हे निषेधार्ह आहे. तुमचा दुतोंडीपणा जनता ओळखून आहे, अशी माहिती व आकेडवारी देत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केला आहे.