Parivartan Mahashakti News : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीत (Mahayuti) सामना रंगणार असून तर दुसरीकडे प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून वेगळी चूल मांडल्याचे चित्र आहे. त्यातच बच्चू कडू यांनी परिवर्तन महाशक्तीची (Parivartan Mahashakti) उमेदवार यादीबाबत भाष्य करत आज किंवा उद्या उमेदवारांची यादी येणार असल्याचे सुतोवाच केले आहे. तसेच समोर कुणीही नेता अथवा दिग्गज उमेदवार असला तरी आम्ही उमेदवार देणारच, असा  निर्धारही आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. ते नागपूर येथे बोलत होते. 


माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetty), स्वराज्य पक्षाचे संभाजीराजे छत्रपती आम्ही सगळे आज बसून बैठक घेणार आहोत. ज्या आमच्या मजबूत जागा आहेत ती यादी आम्ही आज किंवा उद्या जाहीर करणार आहोत. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काय बिघाडी होते यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. जवळपास 100 लोकांची सगळी यादी असेल. मग कोणतेही मोठा नेते असले तर त्या विरोधात आम्ही उमेदवार देणार, आम्हाला कसली भीती आणि बच्चू कडू कधीही भित नाही असे म्हणत प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी तिसऱ्या आघाडीच्या यादी बद्दल भाष्य केलं आहे.


जिल्ह्यात भाजप ठेवायचीच नाही, अशी राणा कुटुंबाने व्यवस्था केलीय


भाजप आपल्याच उमेदवाराला बकरा करू लागली आहे, अशी सध्या स्थिती आहे. भाजपच्या खांद्यावर पंजा फडकवण्याची स्थिती एकंदरीत माझ्या मतदारसंघात भाजपची आहे. जिल्ह्यात भाजप ठेवायचीच नाही, अशी राणा कुटुंबाने व्यवस्था निर्माण केली आहे. प्रवीण तायडे हा नवा कार्यकर्ता आहे. अनेक स्वतः वर गुन्हे दाखल केलेले जूने कार्यकर्ते आहेत. केंद्रात सत्ता असताना नवखे कार्यकर्ते देणे ही भाजपची हार आहे. ज्यानी राम मंदिर चळवळमध्ये सहभागी झाले त्यामध्ये अनेकांचे परिवार बरबाद झाले. अशांना भाजप निवडून आणू शकत नाही, हे मोठं दुर्दैव आहे. सर्व देशात काँग्रेस मुक्त नारा भाजप देत आहे. मात्र बच्चू कडूच्या अचलपूर मध्ये काँग्रेसयुक्त अचलपूर असा एकंदरीत भाजपचा नारा असल्याची टीकाही बच्चू कडू यांनी केली आहे. अचलपूरनंतर बच्चू कडूने महाराष्ट्रात जे संघटन निर्माण केलं आहे, त्यानंतर दोन्ही मोठ्या पक्षांना बच्चू कडू नको आहेत. म्हणूनच अचलपूरमध्ये भाजप काँग्रेस युती म्हणून लढणार आहे. असेही ते म्हणाले.


कार्यकर्त्याला विचारलं तर पक्षाला लाथा मारा, अशी अवस्था- बच्चू कडू 


महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये विदर्भाच्या जागेवरून खडाजंगी रंगताना दिसत आहे. यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, हे सगळं खुर्चीसाठी चालले आहे. त्यांना सामान्य माणसाशी काही घेणे देणे नाही. यांच्यात प्रचंड फूट पडणार आहे आणि माऱ्यामाऱ्या होणार आहेत. आतमध्ये प्रचंड खदखद आहे.  सामान्य कार्यकर्त्याला विचारलं तर पक्षाला लाथा मारा, अशी अवस्था असल्याचेही बच्चू कडू म्हणाले. दरम्यान, विदर्भातील रामटेक, चंद्रपूरमधील वरोरा, आर्वी यासह अजून तीन-चार महत्त्वाच्या जागा आहे, तेथे चांगले उमेदवार मिळाल्यावर त्यांची नावे जाहीर करणार असल्याचेही बच्चू कडू म्हणाले.


कार्यकर्त्यांची किंमत कोणालाच राहिलेली नाही


सध्याचे राजकारण म्हणजे कार्यकर्त्यांची किंमत लोकांना आणि पक्षांना कोणालाच राहिले नाही. त्यामुळे कार्यकर्ते बऱ्याचदा बोलतात की आपण एवढी मेहनत करतो, मात्र निवडणूक आली की जात-पात, धर्मपंथ, पैसा असं वेगळ्या पद्धतीने निवडला जातो, फार निवडक ठिकाणी कार्यकर्त्याचं काम ओळखून उमेदवारी दिली जाते. अशी खंतही बच्चू कडू यांनी बोलून दाखवली आहे.


हे ही वाचा