Vidarbha Vidhansabha 2024: विधानसभा निवडणुकींचे (Vidhansabha election 2024) बिगुल वाजल्यापासून काँग्रेस आणि ठाकरे गटातील जागा वाटपाचा संघर्ष समोर येण्यास सुरुवात झाली आहे. विदर्भातील काँग्रेसचे नेते आता दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. तर ठाकरे गटही आपल्या मतावर ठाम आहे. दोघेही अडून बसल्याचं चित्र सध्या दिसत असून यांच्यातला वाद आता हायकमांडच्या दरबारात मांडला जाणार आहे. ठाकरे गटाने दावा केलेल्या 12 जागांपैकी एकही जागा काँग्रेस सोडायलाच तयार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भातील जागा सोडू नये यासाठी काँग्रेसचे नेते हाय कमांड कडे मागणी करणार असल्याचं सांगितलं जातंय. विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत निवडून आलेले काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी यांनी दक्षिण नागपूर ही आमची पारंपरिक जागा राहिली आहे. त्यामुळे काँग्रेसचा गड आमच्याकडेच राहावा अशी मागणी त्यांनी पक्षाकडे केली आहे. 


दरम्यान विदर्भातल्या ज्या जागेवर काँग्रेसचे संख्याबळ, नगरसेवक होते या सर्व ठिकाणी आम्ही मागणी करणार असल्याचं ते म्हणाले आहेत. यासाठी ते दिल्लीतही जाणार असून काँग्रेस नेत्यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 


काँग्रेस नेते दिल्लीत ठाण मांडून 


विधानसभा निवडणुकांच्या ठाकरे गटाच्या आणि काँग्रेसच्या जागा वाटपाचा घोळ आता चव्हाट्यावर आला आहे. ठाकरे गटाने विदर्भातील दावा केलेल्या 12 जागांपैकी एकही जागा काँग्रेस सोडायला तयार नसल्याचे चित्र आहे. सुनील केदार, आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजीत वंजारी, गिरीश पांडव, संगीता तलमले, उमेश डांगे हे काँग्रेसने नेते आता दिल्लीत दाखल झाले असून विदर्भातील जागा सोडू नयेत यासाठी काँग्रेस नेत्यांच्या भेटी घेत आहेत. 


दक्षिण नागपूरची जागा आमचीच: आमदार अभिजीत वंजारी 


दक्षिण नागपूरची ही पारंपारिक आमची जागा राहिली आहे. या ठिकाणी अनेक काँग्रेसचे आमदार निवडून आलेत. दक्षिण नागपूरचे पहिले आमदार माझे वडील होते. त्यामुळे हा काँग्रेसचा गड असल्याने ही जागा आमच्याकडे रहावी ही आमची रास्त मागणी आहे. असं आमदार अभिजीत वंजारी म्हणाले. 


जागावाटपासाठी संघर्ष नाही


तिकीट मागण्याचा प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे. संघर्ष वगैरे काही नाही. उमेदवारी मागणे हा प्रत्येकाचाच अधिकार मात्र त्या त्या मतदारसंघातील त्या पक्षाची स्थिती जाणून घेण्याची आवश्यकता आहे. इलेक्टिव्ह मेरिट वर जागावाटप झाला तर महाविकास आघाडीच्या बाजूने विदर्भात चांगला निकाल लागेल. असेही आमदार वंजारी यांनी सांगितले.