पुणे : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष एकत्रितपणे निवडणुका लढवण्यावर ठाम आहेत. महायुतीकडून सध्या पक्षांचे मेळावे घेतले जात आहे, पण या मेळाव्यातूनही ते महायुतीचंच सरकार येणार, महायुतीच जिंकणार असल्याचा दावा करत आहेत. पुण्यात (Pune) आज भाजप आणि अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे पार पडत असून पिंपरी चिंचवडमधील मेळाव्यातून अजित पवारांनी तुफान बॅटिंग केली. यावेळी,  लोकसभा निवडणुका आपण एकत्र लढलो, आता विधानसभा निवडणुकाही एकत्रच लढणार आहोत. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढायच्या आहेत, अशी घोषणाच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यामुळे, महायुती ही केवळ विधानसभेपुरतीच असल्याचं स्पष्ट झालं असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात (Election) राजकीय पक्ष स्वतंत्र मैदानात उतरणार असल्याचं दिसून येतं. 


आज पिंपरी चिंचवड,पुणे शहर आणि ग्रामीण असे मेळावे घाय्याचे होते,पण ग्रामीण मेळावा होऊ शकला नाही, असे म्हणत अजित पवारांनी पिंपरीच्या मेळाव्यातील भाषणाला सुरुवात केली. आज गुरुपौर्णिमा आहे, मी सर्व गुरूंना वंदन करतो.काही अफवा पसरवल्या जातात,पुण्यात दीपक मानकर आणि पिंपरीमधील कार्यकर्ते सोबत आहेत. विकासासाठी आपण निर्णय घेतला,विरोध पक्षात राहून आंदोलन करुन विकास होत नाही, प्रश्न सुटत नाही. काहीजण गेले,त्यांना स्वातंत्र आहे. आपल्याला पुणे शहरात जोमाने काम करावं लागणार आहे, वेळ फार कमी आहे. आपल्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला आणि आपण इथपर्यत पोहचलो. 


उद्या नगर दौरा आहे,चार ठिकाणी कार्यक्रम आहे,उद्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकजण पक्षात आले आहेत, त्यांचं स्वागत करतो. अंदाज आहे की विधानसभा निवडणुका ऑक्टोबर शेवटापर्यंत किंवा नोव्हेंबर पहिला आठवड्यात होतील, असे अजित पवारांनी म्हटले. मात्र, त्यासोबतच, लोकसभा- विधानसभा आपण एकत्र लढत असलो, तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आपण स्वबळावर लढायच्या आहेत, अशी घोषणाच कार्यकर्त्यांसमोर अजित पवारांनी केली. त्यामुळे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती एकत्र नसणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. 


जाती-जातीत सलोखा राहिला पाहिजे


2004 पासून मी पालकमंत्री म्हणून काम केलं, आरोप प्रत्यारोपला मी उत्तर देत नाही. मावळात पैसे गेले मावळात पैसे गेले अस बोललं जात होतं,आधी बारामती शिरूरला निधी दिला त्यावर कोणी बोलत नाहीत. सगळ्यां आमदार खासदारांना मी बोलू दिलं,कारण नसताना नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो, असे म्हणत डीपीडीसीच्या बैठकीतील खासदार सुप्रिया सुळेंच्या आरोपावर अजित पवारांनी पलटवार केला. तसेच, मीडिया पुढे काही तरी वेगळं मांडण्यात आल,वडीलधाऱ्यांना बोलू दिलं जातं नाही अस सागितले. पण तसे काही नाही, सुस्कृत महाराष्ट्राची शिकवण यशवंतराव चव्हाण यांनी आपल्याला दिली आहे, असेही अजित पवार म्हणाले. विशाळगड येथे जे घडू नये ते घडलं,कोर्टाने आदेश दिले,त्यांना आता मदत केली.सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, जाती जातीमध्ये सलोखा राहिला पाहिजे, सर्वजण गुण्यागोविंदाने राहिले पाहिजे, असेही पवार यांनी म्हटले. 



हेही वाचा


शरद पवार सत्तेत आले की मराठा आरक्षण जातं, ते सर्वात जास्त भ्रष्टाचारी, अमित शाहांचा पुण्यातून हल्लाबोल