Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Political Updates) पुन्हा एकदा नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) अंतर्गत फुट पडल्यानंतर आता काँग्रेसला (Congress) खिंडार पडल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसमधील वरच्या फळीतील नेत्यांनी पक्षाला रामराम करत पक्षसदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. आधी दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora), मग वांद्रे पश्चिमचे माजी आमदार बाबा सिद्धिकी (Baba Siddique) यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता. त्या दोघांनंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Shankarrao Chavan) यांनीही काँग्रेसचा हात सोडला. 


चव्हाणांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिला. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाची चर्चा राज्यभरात रंगली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत येत्या 15 फेब्रुवारीला चव्हाणांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांनी त्यांचा आमदारकीचा राजीनामा सोमवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवला आणि अध्यक्षांनी तो स्वीकारलाही. चव्हाणांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामाही दिला आहे. या राजीनामा पत्रात त्यांनी आपल्या आमदारपदापुढे माजी असा पेनानं उल्लेख केला आहे. 


काँग्रेसचा 'हात' सोडला, भाजपची साथ देणार?


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन सर्वांनाच चकित केलं आहे. अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस (आघाडी) सरकारमध्ये वरिष्ठ मंत्रीपदे भूषवली आहेत आणि दोन वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही होते. ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचे वडील म्हणजे, शंकरराव चव्हाण. शंकरावांनी महाराष्ट्राचं दोनदा मुख्यमंत्रीपद भूषवलं. अशोक चव्हाण आणि शंकरराव चव्हाण ही राज्यात मुख्यमंत्री राहिलेली एकमेव पिता-पुत्र जोडी आहे. कालपर्यंत I.N.D.I.A. आघाडीच्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला जास्तीत जास्त जागांची मागणी करणारे अशोक चव्हाणांनी, कोणच्या ध्यानी-मनी नसताना थेट काँग्रेस सोडली आणि आमदारकीचा राजीनामा दिला. 


अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून दिलेला राजीनामा धक्कादायक असला, तरी जवळपास वर्षभरापासून अशोक चव्हाण नाराज असून काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अशोक चव्हाण यांना चांगला काळ पाहून भाजपमध्ये प्रवेश करायचा होता. त्यामुळेच योग्य वेळी ते भाजप प्रवेश करतील अशा चर्चा सुरू आहेत. 


अशोक चव्हाण काँग्रेस नेतृत्वावर नाराज?


अशोक चव्हाण यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद स्वत:साठी हवं होतं, मात्र हे पद नाना पटोले यांना देण्यात आलं. गेल्या काही महिन्यांपासून नाना पटोले आणि अशोक चव्हाण यांच्यातील तणाव खूप वाढला होता. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर आणि महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर अशोक चव्हाण यांना स्वत:साठी चांगली भूमिका हवी होती. आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी यांच्यात फूट पडल्यानंतर त्यांना महाविकास आघाडीचं भवितव्य तसं अवघडचं दिसत होतं. महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावाटपावरून अशोक चव्हाण तसेच फारसे खूश नव्हते. राज्यातील 48 जागांपैकी शिवसेनेनं जास्त जागा लढवाव्यात आणि राष्ट्रीय पक्ष काँग्रेसनं कमी जागांवर निवडणूक लढवावी, हे त्यांना अजिबात मान्य नव्हतं. 


अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यामागे फडणवीसांची खेळी? 


अशोक चव्हाण हे फार पूर्वीच भाजपमध्ये दाखल होऊन शिंदे मंत्रिमंडळात मंत्रीपद घेऊ शकले असते, पण चव्हाण यांना मंत्रिमंडळात घेण्याच्या निर्णयावर महाराष्ट्र भाजपचे नेते खूश नव्हते. भाजपमध्ये गेल्यास त्यांनी केंद्रीय राजकारण करावं, अशी राज्यातील भाजप नेत्यांची इच्छा आहे. चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यात देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची भूमिका असल्याचं बोललं जात आहे. गेल्या वर्षीच अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अनेक बैठका झाल्या. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वानंही चव्हाण यांचा भाजपमध्ये समावेश करण्यास ग्रीन सिग्नल दिला आहे. चव्हाण हे भाजपच्या दारात असल्याचं भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी जाहीर व्यासपीठावरून सांगितलं आहे. त्यामुळे चव्हाणांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आता ते भाजपमध्येच जाणार, असं बोललं जात आहे. 


अशोक चव्हाण भाजपसाठी कसे महत्त्वाचे ठरणार? 


2019 च्या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे महाराष्ट्रात भाजपला सत्तेवरून बेदखल केलं आणि बहुमत मिळूनही राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी हातमिळवणी केली, त्या दोन वर्षानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ऑपरेशन लोटसवर काम सुरू केलं. शिवसेनेचं पहिलं बंड एकनाथ शिंदे, नंतर अजित पवारांचं राष्ट्रवादी आणि त्यांचे काका शरद पवार यांच्या विरोधातील बंड. त्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची मोठी कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. आता लोकसभा निवडणूक आली, तेव्हा काँग्रेसमध्येही फूट पडली. अशोक चव्हाण हेही आपल्या जवळचे अनेक आमदार, जिल्हाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, माजी आमदारांना भाजपमध्ये घेऊन जाणार आहेत, अशा चर्चा सुरू आहेत. एक मोठा मराठा चेहराही भाजपमध्ये येणार असून विदर्भात पक्षाला बळ मिळणार आहे.


भाजपचा नेमका प्लान काय? 


2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी, भाजपनं महाराष्ट्रातील 48 जागांचा आढावा घेतला, त्यावेळी असं आढळून आलं की, विदर्भातील लोकसभेच्या 6 जागा पक्षासाठी आव्हान आहेत, ज्यात नांदेड, सोलापूर, लातूर या जागांचा समावेश आहे. भाजपनं अशोक चव्हाण आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सोबत घेतल्यास ही जागाही त्यांना खेचून घेता येईल.  


अशोक चव्हाणांसोबत कोण-कोण जाण्याची शक्यता? 


सूत्रांच्या माहितीनुसार, अशोक चव्हाणांचे 12 ते 14 आमदार काँग्रेस सोडून भाजप प्रवेश करू शकतात. परंतु, हे कदाचित राज्यसभा निवडणुकांनंतर होऊ शकतं. दरम्यान महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांवर निवडणुका होणार आहेत. संख्याबळाच्या आधारे भाजप तीन, शिवसेना एकनाथ शिंदे-1, राष्ट्रवादी अजित पवार-1 राज्यसभेची जागा जिंकू शकतात. पण भाजपनं सहावी जागाही लढवण्याचा निर्णय घेतला, तर ती जिंकण्यासाठी क्रॉस व्होटिंग होऊ शकतं. अशा परिस्थितीत काँग्रेसचे समर्थक आमदार अशोक चव्हाण क्रॉस व्होटिंग करून भाजपची राज्यसभेची जागा जिंकू शकतात. दुसरीकडे, काँग्रेस माजी राज्यपाल रघुराम राजन यांना महाविकास आघाडी संयुक्त राज्यसभेचे उमेदवार म्हणून उभं करू शकते. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


काँग्रेसला घरघर? मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांच्यापाठोपाठ अशोक चव्हाणांचा राजीनामा; चव्हाणांच्या राजीनाम्यामागे 'ही' कारणं