सातारा : लोकसभेच्या निमित्ताने इतरांना एक खासदार निवडण्याची संधी असताना सातारकरांना मात्र एकाचवेळी दोन खासदार निवडण्याची संधी असल्याचं मत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलं. भाजपच्या उदयनराजेंची (Udayanraje Bhosale)  राज्यसभेची अजून अडीच वर्षे बाकी आहेत, त्यामुळे शशिकांत शिंदेंना (Shashikant Shinde) निवडून दिल्यास साताऱ्याला दोन खासदार मिळतील असं मत अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी व्यक्त केलं. 


सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी वाई विधानसभा मतदारसंघातील पाचवड या ठिकाणी सभा घेण्यात आली. त्यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उदयनराजेंच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलवर खिल्ली उडवली. कॉलर कधी टाईट झाली पाहिजेत याबाबत स्पष्टीकरण दिलं. यावर उदाहरण देत असताना त्यांनी सातारकरांना दोन खासदार देण्याची एक वेगळी संधी आल्याचं सांगितलं.


एक खासदार जे छत्रपतींचे वारसदार आहेत, त्यांचे अडीच वर्ष बाकी आहेत. दुसरे शशिकांत शिंदे हे लोकसभेत जनतेतून निवडून जातील असं मत अमोल कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केलं.


सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून उदयनराजे आणि राष्ट्रवादी शरद पवारांकडून शशिकांत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ही जागा शरद पवारांच्या प्रतिष्ठेची जागा असल्याने पवारांनी या ठिकाणी अनेक सभा घेतल्या आहेत. त्याचेवळी भाजपनेही यावेळी सातारा मतदारसंघ हा कोणत्याही परिस्थितीतून राष्ट्रवादीकडून काढून घ्यायचा असा चंग बांधल्याचं दिसतंय. 


राज्यात तिसऱ्या टप्प्यात पवारांची प्रतिष्ठा पणाला


राज्यात तिसऱ्या टप्प्यात रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. जिथं आज घडीला राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 , भारतीय जनता पक्षाचे 4 आणि शिवसेनेचे 4 खासदार होते. मात्र याच भागात शरद पवार आणि अजित पवारांचा, एका अर्थानं राष्ट्रवादीचा मोठा प्रभाव आहे. कारण 2019 साली झालेल्या लोकसभेचा निकाल पाहिला तर राष्ट्रवादीच्या चार पैकी तीन खासदार याच टप्प्यातील मतदारसंघातून आलेत. त्यामुळे आता होणारा तिसरा टप्पा हा राष्ट्रवादीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे. 


मात्र सध्याची राजकीय पूर्णपणे स्थिती बदललीय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलीय. शरद पवार आणि अजित पवारांनी वाटा वेगळ्या केल्यात. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सरळ सामना दिसत असला तरी तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या 11 जागांवर दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.


सातारा आणि माढ्यावर फडणवीसांची विशेष नजर 


सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष नजर आहे. फलटणमध्ये देवेंद्र फडणवीस प्रचाराची सांगता सभा घेणार आहेत. रविवारी सकाळी लातूर तर दुपारी फलटणमध्ये फडणवीस यांची सभा होणार आहे.


ही बातमी वाचा: