हिंगोली : लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) प्रचारात शिवसेना फार पुढे आहे, विजय जवळपास निश्चित आहे. हिंगोली लोकसभेचा सर्व विधानसभा निहाय आढावा घेतलेला आहे. जास्तीत जास्त मतांनी विजयी व्हावा, यासाठी कार्यकर्त्यांनी काम करायला पाहिजे, असं ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी म्हटलं आहे.  ज्यांनी शिवसेनेची गद्दारी केली, त्यांना गाळून टाकू, या उद्देशाने हिंगोली लोकसभेतील शिवसैनिक कामाला लागले आहेत. यश आमचंच आहे, पण हे यश आणखी दैदीप्यमान व्हावं, यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत, असं अंबादास दानवे यांनी सांगितलं आहे.


बहिणीचे काय हाल झालेत, तसेच भावाचे हाल होतील


अंबादास दानवे म्हणाले की, पंतप्रधानांनी जानकर यांना लहान भाऊ संबोधित केला आहे. बहिणीचे (भावना गवळी) काय हाल झालेत तसेच हाल भावाचे होतील. कोकणात निवडणुका या, राणेविरुद्ध ठाकरे होतील. राणेचं काय, राणेंना तर वैभव नाईक यांनी हरवलेलं आहे, आमच्या सावंत यांनी हरवलेला आहे, त्यामुळे ठाकरेंची गरज काय आम्ही शिवसैनिक आहोत ना लढायला तिथले विनायक राऊतच काफी आहेत, त्यांच्यासोबत लढायला, असंही दानवे म्हणाले.


डोळ्यासमोर अपयश दिसतंय म्हणून मोदी-शाहांच्या सभा


महाराष्ट्रात पंतप्रधानांना आणि गृहमंत्र्यांना एवढ्या सभा घ्याव्या लागतात, याचाच अर्थ इथे महाविकास आघाडी मजबूत आहे, त्यांच्या डोळ्यासमोर अपयश दिसतंय. राज्याचे नेतृत्व कुचकामी दिसतंय. दोन पक्ष फोडून गद्दार सोबत घेऊन, यश मिळत नाही, अशी त्यांची स्थिती आहे. त्यामुळे त्यांचा प्रचार सुद्धा अतिशय पोचट झालेला आहे. तेच  बहनो-भाईयो म्हणत खोटारड्या घोषणा करतात, त्याचा कुठलाही परिणाम महाराष्ट्रात होणार नाही, असं म्हणत अंबादास दानवे यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यासह भाजपवर निशाणा साधला आहे.  


रूढी-परंपरा सोडून वैज्ञानिक युगात जायचं का नाही?


सनातन धर्माचा अपमान शिवसेना करते, असं वक्तव्य पंतप्रधान यांनी केलं होतं. यावर उत्तर देताना अंबादास दानवे म्हणाले की, सनातन धर्म या हिंदुस्तानमधील किती लोक मानतात, सनातन धर्माचा अर्थ अगोदर या देशाला समजून सांगावा, या सनातन धर्माचा अपमान कोण-कोण करत, हेही समजून सांगावं सनातन धर्माचा मान कोण-कोण ठेवतं, त्याच रूढी-परंपरा सोडून वैज्ञानिक युगात जायचं का नाही, ते आपण ठरवलं पाहिजे, असं दानवे म्हणाले आहेत.


जखमी झालेला वाघ अतिशय त्वेशाने लढतो


वाघा हा वाघ असतो जखमी निश्चित झालेला आहे आणि जखमी झालेला वाघ अतिशय त्वेशाने लढत असतो. ही लढाई उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही लढतोय करायचं एक आणि सांगायचं एक, असं उद्योगपतीपणाने आम्ही वागत नाही, त्यामुळे आमच्यासोबत मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज बांधव या महाराष्ट्र काय देशात उभे राहिलेत, त्याच पोटसूळ उठतंय, पण मुस्लिम बांधव शिवसेनेसोबतच राहतील, असंही दानवे म्हणाले आहेत.