परभणी: राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झालेला असताना, तेलंगणात यांचा एकही उमेदवार नाही आणि तिथं मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) प्रचाराला चाललेत, हे म्हणजे मुख्यमंत्र्यांची गत ही 'बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना' अशी झाली असल्याची टीका शिवसेना उपनेते आणि परभणीचे खासदार संजय जाधव (Parbhani MP Sanjay Jadhav) यांनी केली. जे यांच्या छाताडावर बसणार आहेत, त्यांचाच हे प्रचार करत आहेत असंही ते म्हणाले. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केल्यानंतर शिवसेनेच्या दत्ता दळवींना अटक करण्यात आली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, राजकारणात बोलीचाली होत असतात, टीका होत असतात. त्यामुळे दत्ता दळवींना अटक केलीय ती चुकीची आहे. 


सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही


उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी आज दुष्काळ प्रश्नावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील अगोदरची दुष्काळी परिस्थिती आणि आताची अतिवृष्टी यावरून सरकारला लक्ष्य केलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी सरसकट कर्जमाफी केली आणि आता हे ना अनुदान देत आहेत ना मदत. त्यातही पीक विमा अग्रीम मंजूर केली, मात्र तीही काहीच शेतकऱ्यांना दिली जातेय. त्याचा लाभ सर्वांना मिळत नाही. सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना भरघोस मदत देऊन दिलासा द्यावा.


महाराष्ट्राचा शेतकरी वाऱ्यावर, पंचतारांकीत शेतकरी तेलंगणाला


'बळीराजा संकटात आणि मुख्यमंत्री प्रचारात मग्न, आज  त्यांची खरी  गरज शेतकऱ्यांना आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांच्या तेलंगणा दौऱ्यावरून  उद्धव ठाकरेंनी  टीका केली आहे.  शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळलेले असताना स्वत:ला गरीब शेतकऱ्यांचा मुलगा  म्हणणारे मुख्यमंत्री तेलंगणा राज्यात निवडणुकांच्या प्रचाराला गेले आहेत. बळीराजाला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री दुसऱ्या राज्यात गेले आहे. शेतकऱ्यांची वाताहत झाली आहे, अशी परिस्थिती असताना आपले राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जायला लाज नाही वाटत, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधला आहे. 


उद्धव ठाकरे म्हणाले, पावसाने मोठं नुकसान झालं आहे. गारपिटीमुळे द्राक्ष आणि कांद्यांचं नुकसान झालं आहे. सरकारमुळे कांद्याचे शेतकरी रडकुंडीला आले होते.यंदा महाराष्ट्रात दुष्काळही आहे आणि आता अवकाळी आहे त्यामुळे राज्यावरचं संकट काही कमी होत नाही. काल एक शेतकरी मंत्र्यांना म्हणाला की तुम्ही मदत करणार असाल तर भेटायला या नाहीतर निघून जा. महाराष्ट्र उघडा पडलाय, गारपीट झाली आहे, शेतकऱ्याची वाताहात झाली आणि तुम्ही तेलंगाणात प्रचाराला जाता, लाज नाही वाटत..आणि मग स्वतःच्या पंचतारांकित शेतीबद्दल सांगता. हवामान खात्यानं इशारा दिला होता की,  या काळात अवकाळी पाऊस पडेल मग  सरकारनं काय केलं?


ही बातमी वाचा: