नायगाव, पालघर :  वाहनांना अचानक लागलेल्या ब्रेकमुळे अनेकदा अपघात घडत असल्याच्या घटना समोर येतात. मात्र, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai Ahmedabad Highway) एक दुर्देवी घटना घडली आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अर्जंट लागलेल्या ब्रेकमुळे दुचाकीवर  मागे बसलेल्या  एका महिलेचा मृत्यू (Death in Accident) झाला आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील (Accident On Mumbai Ahmedabad Highway)  नायगावच्या (Naigaon) बापाने हद्दीत मुंबई लेनवर वर्सोवा पुलाजवळ गुरुवारी, 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. 


ठाण्याच्या ओवाळ माजिवडा येथे राहणारे 30 वर्षीय ऋषी गुप्ता हे आपल्या 25 वर्षीय पत्नी लक्ष्मी गुप्तासोबत वजेश्वरी येथे देवीचे दर्शन घेतले. देवीचे दर्शन घेऊन हे दाम्पत्य दुचाकीने पुन्हा ठाण्याला आपल्या घरी परतत होते.  त्याचवेळी गुप्ता यांच्या समोरील वाहनाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे ऋषी गुप्ता यांनी ही अचानक आपल्या दुचाकीचा  ब्रेक लावावा लागला. अचानकपणे लागलेल्या ब्रेकमुळे त्यांच्यामागे बसलेल्या पत्नी लक्ष्मी गुप्ता यांचा तोल गेला आणि त्या दुचाकीवरून पडल्या. त्याच वेळी त्यांच्या अगदी जवळून जाणाऱ्या सिमेंट मिक्सर डंपर खाली चिरडल्या गेल्या. दु्र्देवी अपघातात त्यांचा मृत्यू झाला. 


या अपघाताबाबत नायगाव पोलिसांनी सिमेंट मिक्सर डंपर चालकावर गुन्हा दाखल केला  असून पुढील तपास करत आहे. मात्र या घटनेनंतर डंपर चालक फरार झाला आहे. पोलिसांकडून फरार झालेल्या डंपर चालकाचा शोध सुरू आहे. दरम्यान, या अपघातानंतर मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील रस्त्याच्या दुरवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अपघात झालेल्या रस्त्याची अवस्था फारशी चांगली नव्हती. खड्ड्यांमुळे हा अपघात झाला का, असा प्रश्न उभा राहिला आहे. 


महादेवाचं दर्शन घेऊन दुचाकीवरून घरी परतत होते, पण ओढणीने केला घात... 


मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर, दुचाकीच्या मागील चाकाला महिलेची ओढणी अडकून झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी, 20 ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घडली. बापाने पुलावरून तुंगारेश्वर येथील महादेवाच दर्शन करुन हे जोडपं परत मुंबईला आपल्या घरी जात होते. त्यावेळी ही दुदैवी घटना घडली आहे.  


व्यवसायाने व्हिडीओ एडिटिंगच काम करणारा मनिषकुमार यादव आणि एका खाजगी कंपनीत काम करणारी त्याची पत्नी प्रतिमा यादव हे रविवार सुट्टीचा दिवस असल्याने वसईच्या तुंगारेश्वर मंदिरात महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भल्या पहाटे 5.30 वाजता पोहचले होते. देवदर्शन झाल्यानंतर ते परत आपल्या बुलेटने घरी कांदिवलीला जात असताना, सकाळी सव्वा सातच्या दरम्यान मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाजवळील बाफाने पूलावर अचानक मागे बसलेल्या प्रतिमाची ओढणी मागील चाकात अडकली. यामुळे तिचा तोल जावून, ती महामार्गावर पडली. अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तिला नजीकच्या रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला तिथं  मृत घोषित केले.