नवी मुंबई: मणिपूरमध्ये अनेकांची घरं जळत असताना, शेती उद्ध्वस्त होत असताना आणि स्रियांवर अत्याचार सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या राज्याकडे ढुंकूनही बघितलं नाही. पंतप्रधानांना त्याठिकाणी साधी चक्कर टाकावी वाटली नाही. एखाद्या राज्यावर एवढं मोठं संकट आल्यावर राज्यकर्त्यांची जबाबदारी असते की त्याला सामोरं जावं, तेथील लोकांना विश्वास द्यावा, त्यांच्यात एकवाक्यता निर्माण करावी आणि कायदा-सुव्यवस्था  जतन करावी. पण पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी त्यापैकी काहीही केले नाही, असे वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. ते रविवारी नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ऐक्य परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मणिपूर आणि इतर राज्यांतील दंगलीच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडले.


महाराष्ट्रात आणि देशातील परिस्थितीत बदल करण्याची गरज आहे. तो बदल करायचा असेल तर सर्व जात-धर्म, भाषा यामध्ये जे अंत आहे, त्याचे विस्मरण करुन एकसंध समजा आणि एकसंध राष्ट्र ही संकल्पना घेऊन एकत्रित काम करण्याची आपल्याला गरज आहे. तो करण्यासाठी ही ऐक्य परिषद मोलाची कामगिरी बजावेल, असे शरद पवार यांनी सांगितले.


मणिपूरच्या मुद्द्यावरुन शरद पवारांची मोदींवर टीका


देशाच्या संसदेत मणिपूरमधील हिंसाचाराची (Manipur Violence) चर्चा झाली. मणिपूरचे विविध जाती, भाषा बोलणारे लोक दिल्लीला आले होते, त्यांनी आम्हाला माहिती दिली. मणिपूरमध्ये पिढ्यानुपिढ्या एकत्र असलेला लहानसा प्रांत अस्वस्थ झाला, दोन जमातींमध्ये संघर्ष झाला. घरदारं पेटवण्यात आली, शेती उद्ध्वस्त करण्यात आली, स्त्रियांवर अत्याचार झाले. पिढ्यानुपिढ्या एकत्र राहणारा, सुसंवाद ठेवणारा समाज आज एकमेकांशी बोलायला तयार नाही. महाराष्ट्रातही मणिपूरसारखं काहीतरी घडण्याची चिंता वाटते. एवढं मोठं संकट राज्यावर आल्यानंतर राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे की, त्यांना सामोरे जाणे. पण पंतप्रधान मोदी यांनी मणिपूरकडे ढुंकून पाहिलं नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.


महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होण्याची चिंता: शरद पवार


मणिपूरमध्ये जे घडलं तेच आजुबाजूच्या राज्यात घडलं, खाली कर्नाटकात घडले. अलीकडच्या काळात महाराष्ट्रातही काही घडले की काय, अशी चिंता वाटायला लागली आहे. सुदैवाने महाराष्ट्राला दिशा देणारे अनेक युगपुरुष होऊ गेले आहेत. त्यांनी समाजाचा विचार केला. आज देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेल्यानंतर अनेक राजे होऊन गेल्याचे ऐकायला मिळेल. पण 350 वर्ष झाल्यानंतरही आजही आदर आणि अभिमान असणारा राजा कोण, असा प्रश्न कोणालाही विचारल्यावर एकच नवा येतं, ते म्हणजे शिवछत्रपती. त्यांनी लोकांसाठी राज्य केले. या देशात अनेक राजे होऊन गेले. दिल्ली मुघलांची होती, देवगिरी यादवांची होती, राजपूतांचं राज्य होतं, पण शिवाजी महाराजांचं राज्य हे भोसल्यांचं नव्हे तर हिंदवी आणि रयतेचं राज्य म्हणून ओळखलं गेलं. हे सूत्र शिवछत्रपतींनी आपल्याला दिले, असे हे शरद पवार यांनी सांगितले.


शिवाजी महाराजांच्या काळातही काहींनी त्यांना विरोध केला. त्यांचा राज्याभिषेक करायचा होता तेव्हा एका स्थानिक समाजातील लोकांनी त्याला विरोध केला. शेवटी उत्तरेकडून कोणालातरी आणावं लागलं. त्या कालखंडात ऐक्याला धक्का देणारा एक वर्ग होता. दुर्दैवाने हा वर्ग आजही कुठे ना कुठे बघायला मिळतो. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण होत आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.


VIDEO: शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका



आणखी वाचा


शरद पवार काय म्हणतात त्यापेक्षा माझं मन, माझे विचार आणि संस्कार काय सांगतात ते महत्त्वाचं : मनोज जरांगे