Raj Thackeray at World Marathi Conference: नवी मुंबई : आज नवी मुंबईत (Navi Mumbai) विश्व मराठी संमेलनाचं (Vishwa Marathi Sammelan) आयोजन करण्यात आलं आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील या संमेलनासाठी उपस्थिती लावली आहे. आजपासून 3 दिवस हे संमेलन असणार आहे. वाशीच्या सीडको प्रदर्शन केंद्रावर संमेलन पार पडणार आहे. 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, "राज ठाकरे येतील, तुमच्याशी बोलतील, अनेक विषय सुचवतील, मराठीला कसं पुढे न्यायचं हे सांगतील. पण मी आज तुमच्यासमोर उभा आहे. गेली अनेक वर्ष मराठी विषयावर बोलतोय, अंगावर केस घेतल्या आहेत, मराठी विषयासाठीच मी जेलमध्ये गेलो. मी आताही तेच सांगत होतो की, मी अत्यंत कडवट मराठी आहे. माझ्यावर संस्कारही त्याचप्रकारचे झाले आहेत. आजोबांचे पुस्तकरुपात झाले. बाळासाहेंबांचे, माझ्या वडिलांचे झाले आणि महाराष्ट्रातील अनेक लोकांचे झाले आणि महाराष्ट्र ही काय ताकद आहे, हे जसंजसं समजत गेलं, तसातसा मी आणखी त्याच्या प्रेमात पडत गेलो. जूनमध्ये मला अमेरिकेतील मराठी मंडळानं आमंत्रण दिलं. याचे अध्यक्ष मला भेटले त्यांनी मला सांगितलं की, आम्ही अमेरिकेत 100 मराठी शाळा काढल्या आहेत. महाराष्ट्रातल्या मराठी शाळा बंद होत असताना, अमेरिकेत मराठी शाळा सुरु होतात, हे काही कमी आहे का?"


हिंदी ही आमची राष्ट्रभाषा नव्हे : राज ठाकरे 


"मला असं वाटतं की, महाराष्ट्रात लक्ष देणं गरजेचं आहे. जगभरात मराठी माणूस पसरलेला आहे, इतर देशांमध्ये गेलेला आहे, त्याबद्दल अभिनंदन. जेवढा महाराष्ट्राचा विचार इतर लोकांमध्ये, देशांमध्ये नेता येईल आणि आपण किती श्रीमंत आहोत, हे सांगता येईल ते उत्तमच. महाराष्ट्रात, महाराष्ट्रातील शहरांमध्ये आज मराठी सोडून ज्यावेळी हिंदी कानावर येऊ लागते, त्यावेळी मला त्रास होऊ लागतो. भाषेला विरोध नाही, भाषा उत्तम. पण हिंदी ही आमची राष्ट्रभाषा नव्हे, जशी मराठी, तमिळ, तेलगु, गुजराती भाषा आहेत, तशीच हिंदीसुद्धा भाषा आहे. या देशात राष्ट्रभाषेचा कधी निवाडा झालाच नाही, राष्ट्रभाषा म्हणून कोणतीही भाषा नेमली गेलीच नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील समन्वयासाठी हिंदी आणि इंग्रजी या दोनच भाषा ठेवल्या. पण हिंदी ही राष्ट्रभाषा नव्हे, हे जेव्हा पहिल्यांदा मी बोललो, त्यावेळी अनेकजण माझ्या अंगावर आले.", असं राज ठाकरे म्हणाले. 


महाराष्ट्रात पहिलीपासून दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य करा : राज ठाकरे


"आजही तुम्ही गुगुलवर गेलात, तर तुमच्या लक्षात येईल हिंदी आपली राष्ट्रभाषा नाही, उत्तम असली तरिही. आमच्यावर हिंदी चित्रपटांचे संस्कार झाले, हिंदी चित्रपटांमधून आमच्या अंगावर हिंदी आली. पण बोलताना मराठी लोक हिंदी का वापरतात? इतकी उत्तम मराठी भाषा आहे. खरं तर मराठी भाषेत जो विनोद होतो, तो मला नाही वाटत इतर दुसऱ्या भाषेत होत असेल, इतकी समृद्ध आपली भाषा आहे. पण आजी ही भाषा घालवण्याचा, बाजूला सारण्याचा ज्या प्रकाराचा राजकीय प्रयत्न होतोय, ते पाहून माझी तळपायाची आग मस्तकात जाते. महाराष्ट्रातल्या मराठी शाळा सोडून... ते काय नवं लचांड आलंय, सीबीएसई काय काय गोष्टी आल्यात नवीन. त्या शाळांमध्ये पहिलीपासून दहावीपर्यंत मराठी भाषा अनिर्वाय करा. मला समजत नाही, ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला, जिथे तुमची मुलं झाली, त्या मुलांना तुमच्या शाळेत काय शिकवलं जातं, जर्मन, फ्रेंच. सर्व भाषा शिका, पण जिथे राहाताय तिथली स्थानिक मातृभाषा तर शिका पहिली आणि यात कमीपणा कसला आला.", असं राज ठाकरे म्हणाले. 


देशाच्या पंतप्रधानांना स्वतःच्या राज्याबाबतचं प्रेम लपवता येत नसेल, तर तुम्ही आम्ही का लपवतोय? : राज ठाकरे 


राज ठाकरे पुढे म्हणाले की, "मराठीबाबत बोलल्यानंतर तुम्ही म्हणणार संकुचित आहे, पण कशासाठी संकुचितपणा? या देशाच्या पंतप्रधानांना जर त्यांच्या देशाबाबत वाटतं, त्यांच्या राज्याबाबत वाटतं... जगातील सर्वात मोठा पुतळा पंतप्रधानांना गुजरातमध्ये बांधावासा वाटतो. आता गिफ्ट सिटी पंतप्रधानांना गुजरातमध्ये बांधावी असं पंतप्रधानांना वाटतं, हिऱ्यांचा व्यापारही पंतप्रधानांना गुजरातमध्ये न्यावासा वाटतोय, न्यावा त्यांनी. मला असं म्हणायचंय, देशाच्या पंतप्रधानांना स्वतःच्या राज्याबाबतचं प्रेम लपवता येत नसेल, तर तुम्ही आम्ही का लपवतोय?"


अनेकांना वाटेल राज ठाकरेंनी पंतप्रधानांवर टीका केली, पण ही टीका नाही : राज ठाकरे 


"आता अनेकांना वाटेल राज ठाकरेंनी पंतप्रधानांवर टीका केली. पण टीका नाही ही, जो मूळ माणूस आहे, त्याला प्रत्येकाला आपल्या राज्याबाबत, भाषेबाबत आणि माणसांबाबत प्रेम आहे, मग तुम्ही का लपवताय? ज्या राज्यात मी राहतो, त्या राज्यातला मराठी माणूस घर घ्यायला जातो आणि तिथल्या एका जैन सोसायटीमधला माणूस सांगतो, आम्ही तुम्हाला घर देणार नाही, तेव्हा काय करायचं आम्ही? देशातल्या इतर राज्यांमध्ये करुन दाखवा की, तिकडच्या स्थानिक माणसाला घर दिलं जात नाही पैसे असूनही... असं महाराष्ट्रातच का होतं? कारण आमचं बोटचेपे धोरण... आम्हीच पहिले मागे हटतो. कोण म्हणतं मराठी माणसाकडे पैसे नाहीत? जे स्वतःच्या गल्लीच्या बाहेर पडत नाही, ते सांगतात मराठी माणसाकडे पैसे नाहीत, एकदा महाराष्ट्र फिरुन बघा, मराठी माणसं कुठे पोहोचलीत.", असं राज ठाकरे म्हणाले.  


पाहा व्हिडीओ : Raj Thackeray Speech : सर्व बोर्डांच्या शाळांना पहिली पासून मराठी भाषा अनिवार्य करा ABP MAJHA