नवी मुंबई :  ऐन उन्हाळ्यात  नवी मुंबईच्या पाणीपुरवठ्याबाबत  (Navi Mumbai Water Cut Nws) मोठी बातमी समोर आली आहे.   येत्या सोमवारी  आणि मंगळवारी (10- 11 एप्रिल)  जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे.  नवी मुंबईच (Navi Mumbai News)  10 आणि 11  एप्रिलला अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा होणार नाही. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन  विभागातील नागरिकांना केले आहे. 


नवी मुंबई महानगरपालिकेची मुख्य जलवाहिनी चिखले येथे पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वे मार्गाकरिता स्थलांतरीत करणे व कळंबोली येथे एक्स्प्रेस वे पुलाखाली दिवा-पनवेल रेल्वे लाईन क्रॉसिंग करुन जलवाहिनी टाकण्यासाठी आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. तसेच भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र, मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल - दुरुस्तीची व इतर कामे करणे आवश्यक आहे. त्यामुळे सोमवारी (10 एप्रिल) सकाळी 10.00 ते दुस-या दिवशी मंगळवारी (11 एप्रिल 2023) सकाळी 10.00 वाजेपर्यंत भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.  पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. तसेच  11 एप्रिल  रोजी संध्याकाळचा पाणी  पुरवठा टप्प्याटप्प्याने कमी दाबाने सुरू होईल.


पाणी जपून वापरण्याचे आवाहन


 नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तसेच कामोठे (Kamothe), खारघर (Kharghar) नोडमधील  भागातील रहिवाशांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी पुरेसे पाणी साठवून ठेवण्याचा सल्ला दिला आहे आणि शटडाऊन दरम्यान महामंडळाला सहकार्य करावे. दुरुस्तीचे काम पूर्ण होताच पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन पालिकेने दिले आहे.  पाणी कपातीच्या कालावधीत नवी मुंबईकर नागरिकांची गैरसोय होणार आहे. पाणी काटकसरीने वापरुन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे असे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.


मुंबईत 31 मार्चपासून 30 दिवस 15 टक्के पाणीकपात 


मुंबईत 31 मार्चपासून 30 दिवस पाणीकपात (Water Cut) लागू  करण्यात आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा (Water Supply) करणाऱ्या जलबोगद्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे ही पाणीकपात लागू करण्यात आली असल्याचे मुंबई महापालिकेने (BMC) सांगितले. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे कूपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहचली. त्यामुळे पाणी गळती होत आहे. ही गळती दुरुस्त करण्याचे काम  सुरु करण्यात आले आहे. या कामामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात  31 मार्च 2023 पासून पुढील 30 दिवस 15 टक्के पाणीकपात लागू राहणार आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Mumbai Water Cut: मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा; ऐन उन्हाळ्यात पाणी कपातीची शक्यता, सातही धरणांमध्ये 37 टक्केच पाणीसाठा