मुंबई :  मुंबईत रात्रीपासून पावसाची (Mumbai Rain)  संततधार सुरू आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे. पावसाचा लोकलवरही (Mumbai Local)   परिणाम झाला आहे. मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे रूळांवर पाणी साचल्याने ठप्प झाल्या आहेत. तर, पश्चिम रेल्वेही उशिराने धावत आहे. यामुळं प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. याच गर्दीमुळं एका महिला प्रवाशाचा गंभीर अपघात झाला आहे. या अपघातात तिला दोन्ही पाय गमवावे लागले आहे.


समोर आलेल्या माहितीनुसार,  पनवेलवरून ठाण्याकडे जाणारी लोकल सकाळी नऊच्या दरम्यान बेलापूर सीबीडी रेल्वे स्टेशन येताना एक महिला पाय घसरून रुळावर पडली. तिच्या अंगावर रेल्वेचा पहिला महिला डब्बा गेला. त्यामुळे प्रवाशी आणि रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडाली. मात्र रेल्वे आणि पोलिस प्रशासनाने काही वेळात रेल्वे मागे घेऊन तिचा जीव वाचवला. पण महिलेचे दोन्ही पाय वाचू शकले नाही.


नागरिकांची कार्यालयात जाण्यासाठी धावपळ


रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे कुर्ला, चुनाभट्टी परिसरात पाणी साचले होते, त्यामुळे हार्बरवर अनेक रेल्वे उशिराने धावत होत्या तर काही ट्रेन रद्द करण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांची कार्यालयात जाण्यासाठी धावपळ सुरू होती. यातच अनेक तासापासून बेलापूरवरून ठाण्याला जाण्यासाठी रेल्वे नसल्यामुळे प्रवाशांनी रेल्वे पकडण्यासाठी गर्दी केली होती. गर्दीत महिलेचा पाय घसरून रेल्वे रुळावर पडली आणि तिच्या अंगावरून रेल्वेचा पहिला डब्बा गेला. सततच्या पावसामुळे मुंबईच्या आकाशातील दृश्यमानता कमी झाली आहे. याचा परिणाम मुंबई विमानतळावरील हवाई वाहतुकीवरही झाला आहे. आतापर्यंत जवळपास 27 विमानांच्या दिशा बदलण्यात आल्या आहेत.


गरज असेल तरच बाहेर पडा, मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन


 मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून रेल्वे मार्गावरील वाहतुकही बाधित झाली आहे. ट्रॅकवरील पाणी काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू असून लवकरच वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.  गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.  


हे ही वाचा : 


Mumbai Rain: मुंबईसाठी पुढील तीन-चार तास अत्यंत महत्त्वाचे, दुपारी समुद्राला उधाण येणार, रेल्वे अजूनही विस्कळीतच