Navi Mumbai News : संभाजीराजे  छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेची (Swarajya Sanghatna) पहिली जाहीर सभा काल (26 मार्च) नवी मुंबईतील (Navi Mumbai) कोपरखैरणे येथे पार पडली. बाईक रॅलीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ती शक्तिप्रदर्शन करत ही जाहीर सभा घेण्यात आली. या जाहीर सभेदरम्यान छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी 2024 च्या सर्व निवडणुका लढवणार असल्याची घोषणा केली. यावेळी स्वराज्य संघटना देखील आता राजकीय पक्ष म्हणून समोर आली आहे. यासोबतच संभाजीराजे यांनी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर जोरदार टीका केली. दोन्ही मंत्री मग्रूर असून त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली. दरम्यान 12 मे 2022 रोजी संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य संघटनेची स्थापना केली होती.


तुम्हाला आताचे पुढारी पाहिजेत की सुसंस्कृत पुढारी हे निवडा : संभाजीराजे


यावेळी केलेल्या भाषणात संभाजीराजे यांनी येत्या 2024 मध्ये स्वराज्य संघटना राजकारणात येणार असल्याची घोषणा केली. ते म्हणाले की, "साडेतीनशे वर्षानंतर देखील शिवाजी महाराजांच्या वंशजाला तितकेच प्रेम करतात. राजकीय गुण माझ्यात नाही. नशिबाने मला फसवलं म्हणून माझ्यात चीड निर्माण झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे स्वराज्य निर्माण करण्याचे प्रयत्न तर करु. तुम्ही ताकद द्या, 2024 मध्ये बदल दिसेल. स्वराज्य म्हणजे तुमचं राज्य. 2024 मध्ये तुमच्या हातात सगळे आहे. तुम्हाला आताचे पुढारी पाहिजेत की सुसंस्कृत पुढारी पाहिजे हे तुम्हाला निवडायचंय."


पांढरा रंग लावला म्हणून व्हाईट हाऊस होत नाही, संभाजीराजेंची गणेश नाईकांवर टीका


संभाजीराजे यांनी नवी मुंबईतील या सभेत गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, जसे अमेरिकेत व्हाईट हाऊस तसे इथे पण व्हाईट हाऊस आहे. आम्ही सांगू तो आमदार, नगरसेवक, कॉन्ट्रॅक्टर. परंतु आम्हालाही हुकूमशाही चालत नाही. "एकच व्हाईट हाऊस आहे, ते अमेरिकेत. दुसरं इथे आणायची गरज नाही. पांढरा रंग लावला म्हणून व्हाईट हाऊस होत नाही. लोक ठरवतील तेव्हा ते महत्त्वाचं," अशा शब्दात त्यांनी गणेश नाईकांवर हल्लाबोल केला. सोबतच इथे सर्व राज्याचे भवन आहे, मात्र शेतकऱ्यांसाठी शेतकरी भवन का नाही?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसंच नवी मुंबई विमानतळावर जास्तीत जास्त कामगार नवी मुंबईतील असले पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी केली.


'आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेची दूरवस्था'


संभाजीराजे यांनी भाषणात राज्याचे आरोग्य मंत्री धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यावरही टीका केली. आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच आरोग्य यंत्रणेची दूरवस्था आहे. 6 फेब्रुवारी रोजी धाराशिवमधील प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. एक महिना झालं काहीच सुधारणा झाली नाही. लगेच दुरुस्ती करा अन्यथा मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्र्याचा राजीनामा घ्यावा, असं संभाजीराजे म्हणाले.


'विशालगडावरील अतिक्रमण तात्काळ हटवा'


दरम्यान, राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मुंबईतील माहिमजवळच्या समुद्रातील अनधिकृत वास्तू तोडण्यात आली. याविषयी संभाजीराजे म्हणाले की, परवा माहिममध्ये एक वास्तू तोडून टाकली, त्याचं कौतुक आहे. अफझल खानची कबर हटवली त्याचंही कौतुक आहे. परंतु ज्या किल्ल्याने संरक्षण दिलं, वाचवलं त्या विशाल गडाची दूरवस्था झाली आहे, तिथलं अतिक्रमण हटवा.