नाशिक :  शेतकरी कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक आहे. मात्र समाधानकारक नाही, शेतकऱ्यांच्या मनात अजूनही असंतोष आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावात उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.


शेतकरी लढ्याचा इतिहास घडवणाऱ्या नाशिकच्या शेतकऱ्यांचं दर्शन घेण्यासाठी आज मी इथं आलोय. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांवरील कर्ज या निर्णयाने बऱ्यापैकी कमी होईल. पण ज्या शेतकऱ्यांनी संपाची ठिणगी टाकली त्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी अपेक्षाही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.

1 एप्रिल 2012  ते 30 जून 2016 या कालावधीत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंतचं कर्ज सरसकट माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. सरकारने 2016 ऐवजी 2017 पर्यंतच्या थकबाकीदारांना दिलासा द्यावा, कांद्याला हमीभाव द्यावा, यासाठी शिवसेना पाठपुरावा करेल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर सरकारला स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावीच लागेल, असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील राहिल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.

दरम्यान शेतकऱ्यांवरचे गुन्हे दिसले, तर सरकारचं काय करायचं ते मी बघतो, असा सज्जड दमही उद्धव ठाकरेंनी दिला.

कर्जमाफी ही शेतकऱ्यांच्या शौर्याचं यश असल्याचंही उद्धव ठाकरे सांगायला विसरले नाहीत. रविवारी पिंपळगावातील शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरेंनी संवाद साधला. शेतकरी संवाद यात्रा पिंपळगाव ते पुणतांबा दरम्यान होणार आहे. रविवारी दिवसभर उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत.