नाशिक : अडीच महिने उलटूनही पावसाने पाठ फिरवल्याने नाशिक (Nashik) जिल्ह्यातील धरणांची तहानही भागू शकलेली नाही. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत अजूनही धरणांमधील पाणीसाठा 28 टक्क्यांनी कमीच आहे. शहरवासीयांसह अनेक तालुक्यांमधील रहिवाशांनी गेल्या अडीच पावणे तीन महिन्यांत मुसळधार पाऊसच अनुभवलेला नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांची (Crop Damage) चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. 


नाशिकसह जिल्ह्यातील (Nashik District) बहुतांश भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून अलनिनो वादळाच्या प्रभावामुळे यंदा पाऊस लांबणीवर पडला. त्यामुळे तब्बल अडीच महिन्याचा कालावधी उलटूनही समाधानकारक पाऊस नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. एकीकडे धरणे भरलेली नाहीत दुसरीकडे जूनच्या पावसावर (Maharashtra Rain) शेतकऱ्यांनी खरिपाचा हंगाम सुरु केला, मात्र अशातच पावसाने (Rainy Season) तीन महिन्यापासून दडी मारल्याने पिके करपण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अनेक भागात समाधानकारक पाऊस नसल्याने दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. तर धरणे देखील कोरडीठाक असल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. 


दरम्यान, धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस नसल्याने धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा वाढण्यावरही मर्यादा आल्या आहेत. जिल्ह्यात मध्यम आणि मोठ्या आकाराची मिळून 24 धरणे आहेत. या धरणांची पाणी साठवण क्षमता 65 हजार 664 दशलक्ष घनफूट आहे. सध्या धरणांत 43  हजार 273 दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध आहे. गतवर्षी हाच पाणीसाठा 61 हजार 871 दशलक्ष घनफूट होता. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा 19 हजार 420 दशलक्ष घनफूट पाणी कमी आहे. गतवर्षी 94 टक्क्यांवर असलेला पाणीसाठा यंदा मात्र केवळ 66 टक्के एवढ्यावरच स्थिरावला आहे. शहरवासीयांसह जिल्ह्यातील काही तालुके आणि मराठवाडावासीयांचे लक्ष लागून असलेल्या गंगापूर (Gangapur Dam) धरणातील पाणीसाठादेखील गेल्यावर्षीच्या तुलनेत चार टक्के पाणीसाठा कमी आहे. गेल्यावर्षी 95 टक्के पाणीसाठा होता. यंदा 11 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर धरणसमूहातील पाणीसाठा 18 टक्क्यांनी कमी आहे.


खरीप हंगामातील पिकांची चिंता


नाशिक जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. जिल्ह्यातील पर्जन्यमान या कालावधी 348 मिलिमीटरपर्यंत जाण्यापेक्षा असताना यंदा मात्र पावसाने पाठ फिरवल्यामुळे अजूनही जिल्ह्यातील पाऊस 60 टक्क्यांच्या पुढेही सरकलेला नाही. सर्वच ठिकाणी सरासरीपेक्षा पाऊस कमी असल्याने शेतकऱ्यांना चिंता आहे. पुरेसा पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पिकांची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. तर पुढील पिकांच्या लागवडीचाही प्रश्न निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत महत्त्वाचं पीक म्हणून ओळख असलेल्या भात पिकाच्या वाढीवर परिणाम झाल्याचं चित्र आहे. धरणांचा जिल्हा म्हणून अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील काही धरणांच्या साठ्यात वाढ दिसत आहे. तर काही धरणांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. 



इतर महत्वाची बातमी : 


Nashik Rain Update : नाशिकचा पाणी प्रश्न सुटला, मात्र जिल्ह्याचं काय? अजूनही पाच धरणे 50 टक्क्यांच्या खाली, तीन धरणे शुन्यावर