नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यात कांदा व्यापाऱ्यांच्या बंदचा आजचा सलग तिसरा दिवस असून बुधवारपासून कांद्याचे लिलाव पूर्णतः ठप्प आहेत. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी काल (21 सप्टेंबर) व्यापारी प्रतिनिधींसोबत एक बैठक घेतली. मात्र, ही बैठकही निष्फळ ठरली आहे. त्यानंतर सरकारने व्यापाऱ्यांवर कारवाई सुरवात केल्यानंतरही व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम असून याबाबत आज व्यापाऱ्यांची येवल्यात (Yeola) बैठक होत असून यानंतर काही तोडगा निघतो का? हे पाहावं लागणार आहे. 


नाशिक जिल्ह्यातील कांदा प्रश्न (Nashik Onion Strike) चांगलाच पेटला असून शेतकऱ्यानंतर आता व्यापाऱ्यांकडून सलग तीन दिवसांपासून बंद पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर तीन दिवसांपूर्वी व्यापारी संघटनेकडून निवेदन देण्यात आले होते. या निवेदनावर चर्चा करत पणन मंत्र्यांनी 26 सप्टेंबर रोजी बैठकीचे आयोजन केले होते. मात्र तरीदेखील व्यापाऱ्यांचा बंद (Onion Traders Strike) सुरूच असून कालच या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी व्यापाऱ्यांसोबत बैठक घेत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र या बैठकीतूनही काहीच निष्पन्न होऊ शकले नाही. या बैठकीत व्यापारी वर्ग आक्रमक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम असून आजही लिलाव बंद (Export onion) ठेवण्यात आले आहेत. मात्र या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर व्यापारी एकत्र येत असून आज येवला शहरात बैठक घेण्यात येत आहे. या बैठकीतून पुढची दिशा ठरवली जाणार आहे. 


दरम्यान लिलाव बंदवर ठाम असलेल्या व्यापाऱ्यांविरोधात सरकारने कारवाईचा बडगा देखील उगारला आहे. कांदा व्यापाऱ्यांना बाजार समित्यांकडून (Nashik Bajar Samiti) परवानगी रद्द करण्याबाबतच्या नोटीस बजावल्या गेल्यात. मागील दोन दिवसांपासून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कालच पालकमंत्री दादा भुसे यांनी बैठक घेतली, यात व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व सरकारी अधिकारी देखील उपस्थित होते. मात्र या बैठकीतून काही तोडगा निघाला नाही, व्यापाऱ्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहून हा बंद सुरूच ठेवला. आज पुन्हा व्यापाऱ्यांची या संदर्भात महत्वाची बैठक बोलवण्यात आली असून तत्पूर्वी सरकारने व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलेला आहे. या संदर्भात आज दुपारी तीन वाजता येवल्यामध्ये व्यापाऱ्यांची बैठक होईल आणि या बैठकीत पुढची भूमिका निश्चित होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


आज येवल्यात व्यापाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक 


आज येवल्यात व्यापाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार असून या बैठकीत काय निर्णय होतो हे पाहावं लागणार आहे, मात्र आजही 17 बाजार समिती या बंदच राहणार असून त्याचा परिणाम थेट शेतकऱ्यांवर होणार आहे. त्याचबरोबर बहुतांश बाजार समित्या या शनिवार आणि रविवारी बंद असतात, त्यामुळे तो फटका देखील शेतकऱ्यांसह संपूर्ण उलाढालीवर बसणार आहे. त्यांनतर सोमवारच्या दिवशी बाजार समित्या सुरू ठेवायच्या का? याबाबत आज निर्णय होऊ शकतो. कारण 26 सप्टेंबर रोजी पणन मंत्र्यांनी नियोजित बैठक ठेवलेली आहे. या बैठकीत व्यापाऱ्यांनी केलेल्या मागण्यांवर चर्चा होणार आहे. कारण व्यापाऱ्यांनी केलेल्या मागण्या या केंद्र सरकारशी निगडित असून त्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची आजची बैठक आणि मंगळवारी पणन मंत्र्यांकडून आयोजित बैठकीत कांदा कोंडी सुटते का हे पाहावे लागणार आहे. 


इतर महत्वाची बातमी : 


Agriculture News : व्यापारी कांद्याचे लिलाव बंदच ठेवणार, मंत्री भुसेंसोबत झालेल्या बैठकीत निर्णय नाहीच