नाशिक : राज्यात जून ते सप्टेंबरदरम्यान पावसाने फिरविलेली पाठ, त्यामुळे भूजलाची कमतरता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची स्थिती या सर्व घटकांचा परिणाम झालेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळ (Drought) जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील 15 जिल्ह्यांतील 40 तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे. परंतु नाशिक (Nashik) जिल्ह्यातील केवळ तीन तालुके दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट असल्याने उर्वरित दुष्काळी तालुक्यांचा समावेश करून संपूर्ण नाशिक जिल्हा दुष्काळी घोषित करावा, अशी मागणी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) यांनी केली आहे.


केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मुंबई (Mumbai) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath Shinde) यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. यावेळी चांदवड, देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर (Rahul Aher)हेदेखील उपस्थित होते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणीसंकट निर्माण झाले असून, अनेक तालुक्यांत अत्यल्प पर्जन्यवृष्टी झाल्याने खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला आहे. फळबागा व बागायती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना कृषीविषयक अनुदान मिळणे गरजेचे आहे. त्यात नदीनाले, छोटे-मोठे पाझर तलाव कोरडेठाक पडले. यामुळे पाण्याची तीव्र टंचाई (Water Crisis) निर्माण झाली असून, तालुक्यात काही गावांत भर पावसाळ्यातदेखील टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. आता यात आणखी भर पडली असून प्रशासनाकडे टँकरची मागणी केली सुरू झाली आहे.


दरम्यान असे असताना राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव (Malegaon), येवला व सिन्नर (Sinner) हे तीन तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले होते. मात्र देवळा, चांदवड व नांदगाव, निफाड, सुरगाणा, कळवण, दिंडोरी, पेठ या तालुक्यात देखील दुष्काळाची भयावय परिस्थिती असून तालुक्यातील बहुतांश गावात दिवसात तर काही ठिकाणी दैनंदिन टॅंकर पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच काही तालुक्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट बनला असून पशुपालक मिळेल तेथून व मिळेल त्या किमतीत चारा विकत घेत आहेत. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात जनतेत व शेतकरी वर्गात तीव्र नाराजीचा सुर म्हटला असल्याचं भारती पवार यांनी सांगितलं.


इतर तालुक्यांचाही समावेश करावा


यंदा नाशिक जिल्ह्यात (Nashik rain) पाऊस कमी झाला असून जिल्ह्यातील बहुतांश धरणे निम्म्यावरच आहेत. पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी पुरवणे मोठे अवघड जाणार आहे. त्याचबरोबर यंदा समाधानकारक पाऊस नसल्याने शेती पिकांवर देखील त्याचा परिणाम झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील बळीराजाला दिलासा देण्यासाठी दुष्काळ देखरेख समितीकडून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागवून देवळा, चांदवड व नांदगाव या तालुक्यासह निफाड, सुरगाणा, कळवण, दिडोरी, पेठ या तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात यावा, अशी मागणी डॉ. भारती पवार यांनी केली आहे.


इतर महत्वाची बातमी : 


Maharashtra Drought : फक्त 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर का? पिक विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी सरकारकडून ग्रामीण जनतेचा बळी; किसान सभेचा आरोप