Nashik Kusum Solar Pump : शेतकऱ्यांना (Farmers) पिकांना पाणी देणे मोठे जिकिरीचे काम असते, अशावेळी मोटरच्या साहाय्याने शेतकरी पाणी भरणा करत असतात, मात्र विजेच्या लपंडावामुळे कधी कधी पाणी भरणे राहून जाते. याच पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने 2021 सालापासून शेतकऱ्यांसाठी कुसुम सोलर पंप योजना (Kusum Solar Pump Scheme) ही राबवली जात आहे. मात्र अद्यापही अनेक शेतकऱ्यांपर्यंत हि योजना पोहचली नसल्याचे समोर आले आहे. 


देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य शासन (State Government) अनेक योजना राबवत असून त्यापैकीच एक म्हणजे कुसुम सोलर पंप योजना. अनेकवेळा शेतकऱ्यांना लोडशेडिंग मुळे तसेच सिंचनाच्या सुविधा नसल्याने पिकांना पाणी देणे सहज शक्य होत नाही. परिणामी उत्पादनात घट होते. शेतकऱ्यांवरील हेच संकट दूर करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने कुसुम योजना राबविण्यात येत आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांपर्यत ही योजना पोहचली नसल्याचे वास्तव आहे. शेतकरी बांधवांना वीज बिलाच्या कटकटीतून आणि रात्रीचे पाणी देण्याच्या भयानक जाचातून सुटण्यासाठी कुसुम सौर पंप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सातत्याने करण्यात येत आहे. या योजनेद्वारे खुला प्रवर्ग 90 टक्के तर SC-ST साठी 95 टक्के अनुदान मिळते आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आहे. 


कुसुम सौर कृषी पंप पात्रतेसाठी हे आहेत निकष


ज्या शेतकऱ्यांनी अटल सौर कृषी पंप योजना किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत केलेले अर्ज अद्याप मंजूर न झालेले अर्जदार हे पात्र असणार आहेत.  बोरवेल, विहीर, बारमाही वाहणारी नदी किंवा नाले यांच्या शेजारील, शेततळे तसेच पाण्याचा शाश्‍वत स्रोत शेतामध्ये असणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांची शेती ही दुर्गम भागात आहे. ज्या ठिकाणी वीज कनेक्शन हे उपलब्ध नाही असे शेतकरी या योजनेअंतर्गत अर्जासाठी पात्र असतील. शेतकऱ्यांकडे असलेल्या क्षेत्रानुसार हे सौर पंप मिळणार आहेत. 2.5 एकर शेतजमीन असणारे शेतकरी 3 HP ,5 एकर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना 5 HP,5 एकर पेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना 7.5 HP तसेच अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप यांसाठी अनुदान दिले जाणार आहे.


योजनेच्या लाभासाठी आवश्यक पात्रता


पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी शेततळे विहीर बोरवेल नदी नाले यांच्या शेजारील शाश्वत पाण्याचा शोध उपलब्ध असणारे शेतकरी अटल सौर कृषी पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप अंतर्गत लाभ न मिळालेले शेतकरी. तसेच अर्जदार हा भारताचा रहिवासी असावा. सदर योजनेअंतर्गत, स्वयं-गुंतवणूकीद्वारे प्रकल्पासाठी कोणतीही आर्थिक पात्रता आवश्यक नाही. अर्जदार त्याच्या जागेच्या प्रमाणात किंवा वितरण महामंडळाद्वारे अधिसूचित केलेल्या क्षमता च्या प्रमाणात 2 मेगावॅट क्षमतेसाठी अर्ज करु शकतो. सदर योजनेअंतर्गत शेतकरी 0.5 मेगावॅट ते 2 मेगावॅट क्षमतेच्या सौर उर्जा प्रकल्पांसाठी अर्जदार अर्ज करु शकतात. 


ही आहेत आवश्यक कागदपत्रे


सातबारा उतारा, त्यावर विहिरीची किंवा बोरची नोंद आवश्यक, आधार कार्ड, पासपोर्ट साईझ फोटो, रेशन कार्ड, नोंदणी प्रत, प्राधिकरण पत्र, जमीन प्रत, मोबाइल नंबर , बँक खाते विवरण.