Nashik News : एकीकडे नवनियुक्त पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Ankush Shinde) यांनी नायलॉन मांजा (Nylon Manja) विक्री करणाऱ्यावर कडक करण्यात येईल, असे सूतोवाच दिले असतानाच नाशिक (Nashik) जिल्ह्यातील नायलॉन आणि पतंगाच्या ओढीने एका लहान बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 


नाशिक जिल्ह्यात येवला (Yeola) तालुक्यात ही घटना घडली असून नायलॉन मांजा आणि पतंगाला लपेटून असलेल्या स्थितीत एका बालकांचा मृतदेह नदीकाठी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रोहित नवनाथ पवार असे या बारा वर्षीय मुलाचे नाव आहे. रोहित हा गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. जेव्हा शोधाशोध सुरु झाली तेव्हा त्याचा मृतदेह येवला तालुक्यातील मुखेड परिसरातील गोई नदीत आढळून आला. घटनेने परिसरात शोककळा पसरली असून रोहितच्या अंगांवर नायलॉन मांजा आणि पतंग असल्याने पतंग पकडण्याच्या नादात तो नदीत पडला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 


येवला तालुक्यातील मुखेड परिसरात राहणाऱ्या रोहित पवार याचा मृतदेह मुखेडच्या गोई नदीत आढळून आला. पोलिसांच्या माहितीनुसार पतंग खेळता खेळता तो गोई नदी परिसरात गेला. येथून जाणाऱ्या संदीप जाधव यांच्या हि बाब निदर्शनास आली. त्यांनी संबंधित माहिती पोलिसांना कळवली. पोलिसांच्या मदतीने रोहितच्या आईवडिलांना घटनास्थळी नेण्यात आले. आईवडिलांनी तात्काळ हा रोहितचा असल्याचे सांगितले. पोलीस व गावकऱ्यांच्या मदतीने रोहितचा मृतदेह बाहेर काढला. या ठिकाणी पतंग पकडण्याच्या नादात तो नदीत पडला असल्याचे पोलिसांनी सांगितले. मागील तीन दिवसांपासून रोहितची शोधाशोध सुरु होती. अखेर शोध सुरू असताना नदीकाठी त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. येवला तालुका पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करत मृतदेह येवला शासकीय रुग्णालयात पाठवला. घटनास्थळी पडलेल्या काठी आणि पतंगामुळेच रोहित याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. 


येवला शहर म्हटले कि, राज्यात उत्सवप्रेमी शहर म्हणून ओळखले जाते मकरसंक्रांत हा सण तर येवल्यात पतंग उडवून साजरा केला जातो. संक्रांती निमित्ताने तीन दिवस शहरात पतंग उडविले जातात. पतंगोत्सवात शहरातील बालकांपासून युवक-युवती, पुरुष-महिला व वृद्ध पण पतंग उडविण्याचा मनसोक्त आनंद आपल्या घराच्या बाल्कनीत जाऊन घेत असतात. जानेवारी महिन्यात मकरसंक्रातीला हा पतंगोत्सव साजरा करण्यात येतो. तीन दिवस मोठा उत्साह असतो. दरम्यान रोहितच्या अशा मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.