Nashik News : नाशिकच्या (Nashik) निफाड-पिंपळगाव रस्त्यावरील मार्केट जवळ दोन ट्रॉली जोडून उसाची वाहतूक (Sugarcane Transport) करणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने साठ वर्षीय वृद्धाचा मृत्यू (Death) झाला. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकावर निफाड पोलीस स्टेशनमध्ये (Niphad) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेमुळे एकाच ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडून ऊस वाहतुकीचे सुरू असलेल्या जुगाड रोखण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 


सूर्यभान गोपाळा पवार असे अपघातात मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे. एकीकडे सध्या उसतोडणीची कामे सुरु आहेत. त्यामुळे निफाड पिंपळगाव व निफाड नाशिक निफाड येवला मार्गावरून उसाची वाहतूक ट्रॅक्टरद्वारे केली जात आहे. ही वाहतूक एका ट्रॅक्टरने दोन ट्रॉलीसह करण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. सध्या रानवड व निफाड हे दोन साखर कारखाने बंद असल्याने येथील शेतकऱ्यांनी संगमनेर कोळपेवाडी कादवा कारखान्यांना ऊस दिला आहे. सध्या ऊस तोडणी सुरू असल्याने रस्त्यावर ऊस घेऊन जाणाऱ्या वाहनांची प्रचंड गर्दी होत आहे. या ट्रॉल्यांमध्ये प्रत्येकी 10 ते 12 टन म्हणजेच एकूण 22 टन ऊस वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. 


निफाड पिंपळगाव मार्गावर निफाड येथील वैनतेय विद्यालय येथे जुना सरकारी दवाखाना मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने बाजार भरतो. या गर्दीतून ट्रॅक्टर द्वारे उसाची वाहतूक सुरू असते. त्यामुळे भविष्यात जर दुर्दैव घटना घडली तर त्याच जबाबदार कोण? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. शुक्रवारी निफाड शहराचा आठवडे बाजार असतो. उसाची धोकेदायक वाहतूक याच बाजारातून होते. त्यामुळे किमान शुक्रवारी बाजारातून उसाची वाहतूक बंद ठेवावी, अशी मागणी शहरातील व्यवसायिकांनी आणि नागरिकांनी केली आहे. 


अनेक मार्गावर डबल ट्रॉलीद्वारे वाहतूक 
दरम्यान जिल्हाभरात उसवाहतुकीसाठी सध्या अनेक मार्गावर ट्रॅक्टर दिसून येत आहेत. अनेकदा एकाच ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या जोडलेल्या दिसत आहेत. यामुळे ट्रॅक्टरला मागून येणाऱ्या वाहन धारकाला ओव्हरटेक करताना त्रास होतो. या ट्रॉली आणि ट्रॅक्टरला ओव्हर टेककरेपर्यंत समोरून वाहन येते. त्यामुळे वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागते. त्यातच दोन ट्रॉलींचे वजन वीस टनापेक्षा जास्त असल्याने गतिरोधक उलटताना किंवा चढवून चढावरून असे वाहन नेतांना अपघात होण्याची दाट शक्यता असते. निफाड रेल्वे स्टेशनच्या गेट जवळ मोठमोठे खड्डे असून या खड्ड्यांमधून ऊस वाहून देणारे ट्रॅक्टर जातात.  तेव्हा ट्रॉलीतील लोकांच्या मुळ्या हेलकावे खातात. या ठिकाणी दोनच दिवसांपूर्वी ट्रॉलीला अपघात झाला होता त्यानंतर आता अपघात झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.