Nashik Dada Bhuse : ज्या माणसांसाठी गेल्या सहा महिन्यांपासून आमचे प्रयत्न सुरू होते, त्या माणसासाठी अवघ्या काही तासांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानाचे उड्डाण रद्द करून सर्व व्यवस्था केली. आज तो माणूस आपल्या पायावर उभा असल्याचे सांगत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) संवेदनशील मुख्यमंत्री असल्याचे उदाहरण दादा भुसे यांनी एका प्रसंगातून सांगितले. 


आज शिवजयंती (Shivjayanti) निमित्त नाशिक (Nashik) शहरात विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. अशातच शिंदे गटाकडून भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी दादा भुसे यांनी राज्याला संवेदनशील मुख्यमंत्री लाभला असून तळागाळातील जनतेपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे दादा भुसे म्हणाले. हे सांगताना त्यांनी एक प्रसंग कथन करत मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.  


दादा भुसे (Dada Bhuse) यावेळी म्हणाले की, आजचा दिवस अतिशय शुभ असून छत्रपती शिवाजी महाराजांची (Chatrapati Shivaji Maharaj) जंयती साजरी होत आहे. शिवाय आग्र्याचा महालामध्ये जयंती साजरी झाली असून ही महाराष्ट्राची अभिमानाची गोष्ट आहे. आजच्या दिवसाचे औचित्य साधून वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने आरोग्य शिबीर राबविण्यात येत आहे. आरोग्य शिबीर राबविताना नुसती तपासणी न करता निदान झालेल्या रुग्णांना उपचार मिळवून देणे महत्वाचे आहे. यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून मदत केली जाईल. त्यामुळे आरोग्य शिबिराचा पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. 


एक प्रसंग कथन करताना ते म्हणाले की, आम्ही मालेगावच्या एका रुग्णाला लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज होती. यासाठी रुग्ण शोधणे चालू होते. मात्र सहा महिन्यानंतरही रुग्ण मिळत नव्हता. चौधरी नामक रुग्ण हा मुंबईला एका रुग्णालयात ऍडमिट होता. शेवटी चौधरी कुटूंबियांनी सांगितले की आमचा रुग्ण आता फक्त तीन चार दिवसांचा सोबती आहे. काहीतरी करा असे सांगितल्यावर तात्काळ आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना याबाबत सांगितले.  यावेळी मुख्यमंत्री एका कार्यक्रमाला चार्टर्ड विमानाने निघाले होता, त्यांनी पायलटला सांगून विमान थांबविण्यास सांगितले. मुख्यमंत्र्यांनी संबंधित हॉस्पिटल ला कॉल करून के लागेल ती मदत करण्याचे कळवले. पुढील तीन चार तासात रुग्णाला लागणारी सर्व व्यवस्था करण्यात आली. आणि काही वेळात लिव्हर ट्रान्सप्लांट शस्रक्रिया यशस्वी झाली. अशा पद्धतीने काही वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने व्यवस्था केल्याने रुग्णाला दिलासा मिळाला. म्हणून महाराष्ट्राला संवेदनशील मुख्यमंत्री लाभल्याचे दादा भुसे म्हणाले.