Ashadi Ekadashi 2023: आषाढीला पंढरपूरसाठी (Aashadha Ekadashi) दरवर्षी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची (sant Nivruttinath Maharaj) पायी दिंडी मार्गस्थ होत असते. मात्र यंदा इतिहासात पहिल्यांदाच वारकऱ्यांच्या सोयीच्या दृष्टीने दिंडीच्या मानकऱ्यांच्या मागणीनूसार यात बदल करण्यात येऊन एक दिवस आधीच पालखी त्र्यंबकेश्वरहून प्रस्थान करणार आहे. तसेच एक दिवस मुक्कामाचे ठिकाणही वाढवण्यात आले आहे.


संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या आषाढी वारी पालखी (Pandharpur) प्रस्थान संदर्भात देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी निवृत्तीनाथ पालखी संदर्भात माहिती दिली. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या आषाढी वारी पालखीचे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथून 2 जून रोजी दुपारी 2 वाजता प्रस्थान होणार आहे. दरवर्षी चतुर्दशीच्या दिवशी होणारे प्रस्थान यंदा त्रयोदशीला म्हणजे एक दिवस अगोदर होणार आहे. पालखीचा पहिला मुक्काम महानिर्वाणी आखाडा येथे होणार असून 7 जून रोजी दरवर्षींप्रमाणे सिन्नर (Sinnar) तालुक्यातील दातली येथे पहिला रिंगण सोहळा होणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष नीलेश गाढवे, सचिव ॲड. सोमनाथ घोटेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


दरम्यान समस्त वारकरी संप्रदायाचे लक्ष लागून असलेल्या संत निवृत्तीनाथ महाराज यांचा आषाढी वारी सोहळ्याचे नियोजन आणि मार्ग संस्थानने जाहीर केला आहे. त्यानुसार यंदा 2 ते28 जून या कालावधीत वारी असून त्यात 42 दिंडी सहभागी होणार आहे. दरवर्षी पालखी प्रस्थान हे दुपारी बारा वाजता होत असे. त्यानंतर संपूर्ण त्र्यंबकेश्वरमध्ये मिरवणूक होऊन पालखी शहराबाहेर मार्गस्थ होण्यास मोठा विलंब होत होता. त्यानंतर थेट सातपूरपर्यंतचा टप्पा मोठे अंतर होते, त्यामुळे यंदा एक दिवस अगोदर प्रस्थान करून मिरवणूकीनंतर महानिर्वाणी आखाडा येथे पहिला मुक्काम होणार आहे. त्यानंतर सातपूर व पुढील सर्व मुक्काम नियमित ठेवण्यात आले आहे. 


त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायी दिंडी मार्ग 


त्र्यंंबकेश्वर ते पंढरपूर पायी अंतर जवळपास चारशे किलोमीटरहून अधिक आहे. दिंडीतील वारकरी मंडळी रोज दिवसा वीस किलोमीटर पायी प्रवास करतात. तर वेळापत्रका प्रमाणे रात्री नियोजित असलेल्या ठिकाणी मुक्काम करत दिंडी सत्ताविसाव्या दिवशी पंढरपुरात पोहोचते. या दरम्यान सतरा मुक्कामानंतर पंढरपूर वारी करून पालखी त्र्यंबकेश्वरकडे माघारी येईल. म्हणजेच 2 जूनला संत निवृत्तीनाथ पालखी निघेल. 28 दिवसांचा पायी प्रवास करून 28 जून रोजी पालखी पंढरपुरात दाखल होईल, त्यानंतर परतीचा प्रवास 3 जुलै रोजी सुरु होऊन 20 जुलै रोजी वारकरी पालखी त्र्यंबकेश्वर आगमन होईल.  म्हणजेच पालखी जाऊन-येऊन मिळून 45 दिवसांचा कालावधी आहे. दरम्यान पालखी प्रस्थान झाल्यानंतर यंदा पहिल्यांदाच त्र्यंबकेश्वरी मुक्काम असून त्यानंतर सातपूर, नाशिक, पळसे, लोणारवाडी, खंबाळे, पारेगाव, गोगलगाव, राजुरी, बेलापूर, राहुरी, डोंगरगन, अहमदनगर, साकत, घोगरगाव मिरजगाव, चिंचोली (काळदाते) कर्जत, कोरेगाव, रावगाव, जेऊर, कंदर, दगडी अकोले, करकंब, पांढरीवाडी, चिंचोली, पंढरपूर असा पायी दिंडीचा मार्ग असणार आहे.