Ajit Pawar : अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना आगामी दिवाळी (Diwali Festival) सणानिमित्त नियमित अन्नधान्य व्यतिरिक्त शंभर रुपयांत शिधा संच वितरित करण्यात येणार आहे. यावर टीका करत राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी ही योजना संशयास्पद असल्याचे सांगितले. विरोधी पक्षनेते अजित हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले असता त्यांनी मालेगाव नागरी सत्कार सोहळ्याला हजेरी लावली. 


विरोधी पक्षनेते अजित पवार हे काल एक दिवसीय मालेगाव (Malegaon) दौऱ्यावर असताना त्यावेळी ते बोलत होते. मालेगावी नूरबाग मैदानावर माजी आमदार रशीद शेख (Rashid Shaikh) यांच्या नागरिक सत्कार सोहळ्याप्रसंगी विरोधी पक्षनेते पवार बोलत होते. सोहळ्यापूर्वी शासकीय विश्रामगृहावर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिंदे सरकारकडून दिवाळीनिमित्ताने जनतेसाठी योजना जाहीर केली कि शंभर रुपयांत शासन वस्तू देत आहे. मात्र शासनाने या योजनेत गौडबंगाल केले आहे. याची योग्य आकडेवारी देण्यात येईल, एवढ्या कमी पैशात शासनाने वस्तू उपलब्ध करून दिला, मात्र ही बाब संशयास्पद आहे. गोरगरिबांना वस्तू मिळाल्या पाहिजे, मात्र यात शासनाचा हेतू चुकीचे असल्याचे पवार यांनी सांगितले. 


केंद्र शासनाकडून अल्पसंख्याक समाजावर अन्याय केला जात आहे. सत्तेच्या विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे जाती-धर्मांमध्ये ते निर्माण केली जात आहे. संविधान व लोकशाहीची हत्या केली जात आहे. भाजपची बी टीम म्हणून एमआयएम काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. जातीवादी शक्तीला व भाजपच्या बी टीमला रोखण्यासाठी सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठबळ द्यावे असे आवाहन राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केले. मालेगावचा विकास करण्याची जबाबदारी राष्ट्रवादीची आहे. शहराची रखडलेली कामे नक्कीच पूर्ण होतील. सत्तेत असताना करोडोंचा निधी दिला आहे. सर्व जातीधर्म यांना सोबत घेऊन चालत आहोत. केंद्र सरकार अल्पसंख्यांक जनतेवर अन्याय करत आहे. येणाऱ्या निवडणुकीत जातीवादी शक्तींना रोखण्यासाठी राष्ट्रवादीला साथ द्या, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले. माजी आमदार रशीद शेख यांनी राजकीय वाटचालीची यशस्वी 40 वर्ष पूर्ण केल्याबद्दल शेख यांचा नागरिक सत्कार करण्यात आला. 


शंभर रुपये वस्तू कशा देणार?
केवळ विकासाचे ध्येय ठेवत शेख कुटुंबियांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. येणाऱ्या मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी ताकदीने लढणार व जिंकणार हे उपस्थित त्यांच्या संख्येवरून दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा झंझावात दिसून येईल. मालेगावचा विकास करून 2024 मध्ये मालेगावच्या नेतृत्वाला राज्यात संधी देऊ असे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सांगितले. दिवाळीत जनतेला शंभर रुपयात तेल, साखर, रवा व चणाडाळ देण्याची सरकारची घोषणा आहे. शंभर रुपये त्या वस्तू कशा देणार माहिती नाही, मात्र यात गौड बंगाल असण्याची आकडेवारी प्राप्त करून सत्यता समोर आणू असे सांगत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर टीका केली.