Nashik Hindu Morcha : श्रध्दा वालकर (Shraddha Walkar) हत्याप्रकरणी राज्यभरात आंदोलने होत असून काही दिवसांपूर्वी नाशिक (Nashik) शहरात हिंदू संघटनाकडून (Hindu Sanghatana) विराट मूक मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर आज त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) शहरात विराट मोर्चा काढण्यात आला आहे. श्रद्धा वालकर निर्घृण हत्या प्रकरणी निषेध करत लव्ह जिहादला प्रतिबंध करण्याच्या मागणीसाठी त्र्यंबकेश्वरवासीय रस्त्यावर उतरले आहेत. 


दिल्लीतील (Delhi) श्रद्धा वालकर हत्याकांड (Shraddha Walkar Murder) प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. राजकीय पक्ष, संघटनाकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर शहरात हिंदुत्ववादी संघटनांकडून विराट मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरवात झाली. या ठिकाणी शहरातील असंख्य नागरिक एकत्र येत घोषणांनी शहर दणाणून गेले.छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरवात झाल्यानंतर त्र्यंबकेश्वर मंदिर, तेली गल्ली, कुशावर्त चौक, भाजीपाला मार्केट, एसटी बस स्टॅन्ड मार्गे आंबेडकर चौकात या मोर्चाचा समारोप होणार आहे. सद्यस्थितीत शहरातील मोर्चात प्रचंड गर्दी झाली असून मोर्चाला सुरवात झाली आहे. 


श्रद्धा वालकर निर्घृण हत्या प्रकरणी निषेध करत लव्ह जिहादला प्रतिबंध करण्याच्या मागणीसाठी त्र्यंबकेश्वर येथे हिंदुत्ववादी संघटनाचा विराट मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास वंदन करून मोर्चाला सुरुवात झाली. यामध्ये संपूर्ण तालुक्यातून हजारो हिंदुत्वप्रेमी नागरिक भगव्या टोप्या घालून सहभागी झाले. साधु महंत वारकरी विद्यार्थी महिला मुली यात उत्स्फूर्त सहभागी झाले. यावेळी 'श्रद्धाला न्याय द्या, आफताब ला कठोर शिक्षा करा, अशा घोषणा मोर्चात देण्यात येत होतंय. मोर्चाला गर्दी असल्याने मोर्चा मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


 लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू करण्याची मागणी 
आफताबने दिल्ली येथे श्रद्धा वालकर हीचे 35 तुकडे करत निर्घुणपणे हत्या केली. या घटनेने युवतींमध्ये दहशत निर्माण झाली आहे. दिल्लीच नव्हे तर राज्यात लव्ह जिहादची समस्या गंभीर रूप धारण करीत आहे. त्यामुळे देशात लव्ह जिहाद विरोधी कायदा तसेच धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बीडी भालेकर मैदानात प्रचंड संख्येने महिलांसह पदाधिकारी मोर्चाचं सहभागी झाले असून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे. विराट हिंदू मूक मोर्चाच्या माध्यमातून लव्ह जिहाद विरोधी कायदा तात्काळ करावा तसेच धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा, दिल्ली सारखी घटना रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशा आशयाच्या मागण्या सकल हिंदू समाजाच्या वतीने या मोर्चादरम्यान करण्यात आल्या आहेत.