Nashik Majhi Vasundhara : प्राणवायू निर्मिती करणाऱ्या वृक्षांचा ओझोन पार्क, वनराई बंधारे, भारतीय जातीच्या वृक्षांची लागवड, उद्याने, परसबाग, अंगणवाडी परिसरात सेंद्रिय भाजीपाला लागवड,  कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक बंदी यासह विविध उपक्रम यशस्वीपणे राबविल्याने पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीने दुसऱ्यांदा माझी वसुंधरा पुरस्कार या राजस्तरीय पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली आहे. 


माझी वसुंधरा अभियान 2 मध्ये नाशिक तालुक्यातील पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतींला राज्यातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरपंच श्रीमती अलका बनकर व ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम यांना प्रमाणपत्र देऊन गौरव केला. विशेष म्हणजे या पुरस्कारावर दुसऱ्यांदा हा पुरस्कार पटकाविला आहे. त्यामुळे पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे. 


दरम्यान माझी वसुंधरा अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात देखील पिंपळगाव ग्रामपंचायतीने सहभाग घेतला होता. पिंपळगाव ग्रामपंचायतीने आपल्या मेहनत आणि नियोजनबद्ध काम करण्याच्या जोरावर पुन्हा एकदा राज्यात अव्वल येण्याचा मन मिळवला. पिंपळगाव ग्रामपंचायतीने विविध अभिनव उपक्रम राबवून शहराचा कायापालट केला आहे. प्रत्येक सदस्याने वॉर्डात उद्यान, वृक्षारोपण, पिंकसिटी, सांडपाणी प्रकल्प, घनकचरा प्रकल्प, स्वच्छ व सुंदर पिंपळगाव योजना राबविण्यात आलेल्या आहेत. त्याची दखल राज्य शासनाने घेत अभियानात राज्यात पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायत अव्वल असल्याची घोषणा करीत पुरस्कार देण्यात आला. 


जिल्हा परिषदेच्या सीईओ लीना बनसोड म्हणाल्या कि, 3 ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळणे ही जिल्हयासाठी अभिमानाची व आनंदाची बाब आहे. यावर्षी जिल्ह्यातून 96 ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता. या अभियानात करावयाच्या कामांविषयी माहिती तसेच नियेाजन करुन देण्यात आले. सर्व गावांचे ‘गाव कृती आराखडे’ तयार करुन त्यानुसार अंमलबजावणी करण्यात आली. यापुढेदेखील माझी वसुंधरा अभियानामध्ये शासनाकडून निवडण्यात येणा-या ग्रामपंचायतींमध्ये पर्यावरणपुरक गाव तयार करण्यासाठी काम करण्यात येईल."


जिल्ह्यांत तीन पुरस्कार 
या अभियानात जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी पुरस्कार पटकावले आहेत. यात निफाड तालुक्यातील पिंपळगांव बसवंत ग्रामपंचायतीने राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवला आहे. निफाड तालुक्यातीलच चांदोरी ग्रामपंचायतीने राज्यस्तरीय तृतीय क्रमांक मिळवला आहे. इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे ग्रामपंचायतीला पृथ्वी या घटकासाठी विशेष राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. 


वृक्षांची माहिती गुगल मॅपवर 
'माझी वसुंधरा अभियान अंतर्गत हेरिटेज ट्री' गणना करण्याचे कामकाज सुरु असताना पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीने अनोखा प्रयोग केला होता. पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीने गावातील संपूर्ण वृक्षगणना पूर्ण करून संपूर्ण वृक्षांची माहिती गुगल मॅपवर प्रकाशित केले आहेत. असा उपक्रम राबविणारी पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायत ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. 


राज्यात प्रथम आयएसओ मानांकन 
माझी वसुंधरा अभियान राबवितांना पालिका सदस्य, सेवक वर्ग आणि ग्रामस्थ तसेच गावातील शैक्षणिक संस्थांनी मोठा सहभाग नोंदविला होता. जलशुद्धीकरण, ऑक्सिजन प्लांट, घन कचरा व्यवस्थापन, सौरऊर्जा, जल निस्सारण, स्वच्छता या निकषांवर सहभाग नोंदवित पिंपळगाव ग्रामपालिका विविध उपक्रम राबवित असून त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने सर्व ग्रामपंचायती आयएसओ करणेबाबत ग्रामपालिकेच्या कामांचा आढावा मागितला होता. त्यात पिंपळगाव ग्रामपालिकेने सहभाग घेऊन राज्यात प्रथम आयएसओ होण्याचा मान व पाच लाखांचे बक्षीस पटकावले.