Nashik Crime : नाशिक (Nashik) शहर धार्मिक, ऐतिहासिक, पौराणिक शहर म्हणून ओळखले जाते, मात्र अलिकडच्या वर्षांतील गुन्हेगारीची आकडेवारी पाहिली तर लक्षात येईल कि, नाशिक शहर क्राईम (Crime Capital) कॅपिटल अशी नवी ओळख निर्माण होऊ पाहत आहे. दर दिवसाआड एक खुनाची घटना समोर येत आहे. पंचवटी परिसरात पेठ रोड, पाटालगत असलेल्या समर्थ नगर भागातील मैदानात एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. 


नाशिक ही मंत्रभूमी, यंत्रभूमी आणि तंत्रभूमी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे पर्यटक, भाविक आदींसह रोजगारासाठी इतर राज्यातील नागरिक नाशिक शहरात दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र अलिकडच्या काळात वाढत्या गुन्ह्यांच्या घटनांमुळे गुन्हेगारीचे क्षेत्र होतंय की काय असा प्रश्न सध्या उपस्थित होतो आहे. नाशिक शहरात खुनाचे सत्र सुरुच असून पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाचा खून (Murder) झाल्याची घटना घडली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दगडाने चेहरा ठेचला गेल्याने, मयताची ओळख पटवणे अवघड झाले आहे. स्थानिक नागरिकांना ओळख पटवण्यासाठी बोलावले मात्र, तरी देखील ओळख पटली नाही. 


मोकळ्या पटांगणात तरुणाचा मृतदेह, दगडाने चेहरा ठेचल्याने ओळख पटवणं अवघड


नाशिकच्या पंचवटीतील समर्थ नगरच्या समोर हमालवाडी पाटालगतची घटना आहे. आज सकाळी येथील मोकळ्या पटांगणात एका युवकाचा मृतदेह आढळून आला. अतिशय निर्घृण अशा पद्धतीने खून करण्यात आल्याचे समजते आहे. युवकाचा चेहरा पूर्णतः ठेचल्याने ओळखणे देखील कठीण झाले आहे. अंदाजे तीस ते पस्तीस वयोगटातील युवक असल्याचा पोलीसांचा अंदाज आहे. सहाय्य पोलीस आयुक्त सीताराम गायकवाड, परिमंडळ 1 उपायुक्त किरणकुमार चव्हाण, युनिट 1 व 2 चे अधिकारी पंचवटी पोलिस ठाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सिताराम कोल्हे यांच्यासह अधिकारी कर्मचारी घटनास्थळी उपस्थित असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. 


नागरिकांची सुरक्षितता वाऱ्यावर 


दरम्यान, ओळख पटवण्यासाठी स्थानिक नागरिकांना देखील पाचारण करण्यात आले होते, मात्र चेहऱ्यावर खूप जखमा असल्यामुळे कोणीही ओळख पटवून दिलेली नाही. पोलिसांसमोर या खुनाच्या गुन्हयाची उकल करणे आता मोठे आव्हान असणार आहे. या घटनांमुळे वाढत्या गुन्हेगारीला आळा बसेल का आणि नागरिकांना सुरक्षित वाटेल का? असा प्रश्न उपस्थित झाला असून सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात पोलिसांना पूर्ण अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. यावरुन दिसून येते की शहरातील रक्तपात किती वाढतो आहे. यामुळे नाशिक शहरात पोलिसांचे वर्चस्व आहे की गुन्हेगारांचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे अशा घटनांना आवर कोण घालणार, पोलीस काय करत आहेत? सामान्य नागरिकांची सुरक्षितता? असे कितीतरी प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.