Chhagan Bhujbal : आज अहमदाबादमध्ये (Ahmadabad) जेवढे गुजराती (Gujrat) नाहीत, तेवढे मुंबईत (Mumbai) आहेत. बेंगलोरमध्ये जेवढे कन्नड भाषिक नाहीत, तेवढे मुंबईत आहेत. पाटणामध्ये जेवढे हिंदी भाषिक नाहीत, तेवढे मुंबईत आहेत. मग तिकडच्या मुख्यमंत्र्यांनी त्या त्या भागाचा विकास केला पाहिजे, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujabal) यांनी महाराष्ट्र कर्नाटक वादाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचे नाव न घेता केली आहे. 


आज नाशिक (Nashik) शहरातील भुजबळ फार्मवर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील सध्याच्या वातावरणावर भूमिका मांडली. त्याबरोबरच महाराष्ट्र कर्नाटक वादाच्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, आजच्य घडीला अहमदाबादमध्ये जेवढे गुजराती नाहीत, तेवढे मुंबईत वास्तव्य करतात. बेंगलोरमध्ये जेवढे कन्नड भाषिक नाहीत, तेवढे मुंबईत आहेत. पाटणामध्ये जेवढे हिंदी भाषिक नाहीत, तेवढे मुंबईत आहेत. मग तिकडचाही विकास केला पाहिजे, असा खोचक सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. राज्यात वाढत असलेल्या महागाईवर, कर्नाटक सीमावाद अशा प्रश्नांवर आंदोलन होत आहेत. या पार्श्वभूमीवर 17 तारखेला महाविकास आघाडीचा मोर्चा असल्याचे ते म्हणाले. 


ते पुढे म्हणाले, मी बेळगाव, कारवारला गेलो, त्यावेळी सहा सात लोकांचे बळी गेले. तो प्रसंग आजही आठवल्यावर अंगावर सहारे येतात. मात्र सध्याचे जे राजकारण सुरूय, त्यावरून असे दिसते कि, कर्नाटक सरकारच्या चोराच्या उलट्या बोंबा मारत आहे. बेळगाव, कारवार राहिलं बाजूला आणि जत, अक्कलकोट मागायला लागले आहेत. इकडे महाराष्ट्र राज्यातले प्रकल्प गुजरातमध्ये जात आहेत, यामुळे राज्यातील तरुणांचा रोजगार बुडत आहे, राज्यात बेरोजगारांची संख्या वाढत आहे. याकडे लक्ष सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे. आज अहमदाबादमध्ये जेवढे गुजराती नाहीत, तेवढे मुंबईत, बेंगलोरमध्ये जेवढे कन्नड भाषिक नाहीत, तेवढे मुंबईत, पाटणामध्ये जेवढे हिंदी भाषिक नाहीत, तेवढे मुंबईत असल्याने तिकडचाही विकास केला पाहिजे. सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत आहेत. शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असं लाड बोलले. या लाड साहेबांनी तर आमचा इतिहासच बदलून टाकल्याचे भुजबळ म्हणाले. 


छगन भुजबळ पत्रकार परिषदेत म्हणाले, नवनीत राणा यांच्या एवढं मी मोठा नाही. कर्नाटक सीमावादात अमित शहा घेत असलेल्या बैठकीत फार मोठा दिलासा मिळेल, असं वाटतं नाही. त्याचबरोबर सुषमा अंधारे शिवसेनेच्या नेत्या, उद्धव ठाकरे त्यांच्याबाबत काय तो निर्णय घेतील, समज देतील, असं वाटत.  मात्र नेमकं त्या काय बोलल्या मला माहीत नाही, मात्र वारकऱ्यांनी त्यांना विरोध केल्याचे समजतंय. तसेच ग्रामपंचायत निवडणुकांवर बोलताना नितेश राणे नेमकं काय बोलले, काय झालं मला माहित नाही, त्यामुळे त्यावर बोलणार नसल्याचे ते म्हणाले. 


फुले, आंबेडकरांनी भीक नाही मागितली... 
राज्यभरात वातावरण तापले असून चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादानंतर आंदोलने करण्यात येत आहेत. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यातील भिक मागणं हा शब्द फुले, आंबेडकर अनुयायांना लागला. मात्र  फुले, आंबेडकरांनी भीक नाही मागितली. महात्मा फुले कॉन्ट्रॅक्टर होते, यांनी त्याकाळी अनेक मोठ्या मोठ्या इमारती बांधल्या. स्वाभिमानातून या शाळा उभ्या राहिल्या. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी माफी मागितल्यानंतर पुढे आंदोलनाची गरज नसल्याचे ते म्हणाले.