Chhagana Bhujbal : आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) नाशिक दौऱ्यावर येत आहेत आनंद आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष फिरत आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे नाशिकला आले असतील. शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे 15 वर्षांपूर्वी येवला मतदारसंघात आले असते तर त्यांना फरक कळला असता, असा उपरोधिक टोला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.


सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनाला (Winter Session) दोन दिवस सुट्टी असल्याने मंत्री छगन भुजबळ हे काल राज्यराणी एक्सप्रेसने नाशिक (Nashik) शहरात दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. एकीकडे आदित्य ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर येत असून त्याचबरोबर ते येवला येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. तर काही दिवसांपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील येवला (Yeola) येथे जाहीर सभा घेत भुजबळांना आव्हान दिले होते आणि आता आदित्य ठाकरे हे देखील येवला मतदारसंघात जात असल्याने याबाबत भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले की, "आदित्य ठाकरे येत आहेत, आनंद आहे. काळात निवडणुका असल्याने त्यानुसार प्रत्येक पक्ष फिरत आहे. तसेच अधिवेशनाला सुट्टी असल्याने अनेक जण बाहेर पडत आहेत. संभाजीनगरपर्यंत जात आहेत." "जर आदित्य ठाकरे 15 वर्षांपूर्वी येवल्यात आले असते, तर फरक कळला असता," असा टोलाही भुजबळांनी यावेळी लगावला आहे.


छगन भुजबळ पुढे म्हणाले की सर्वदूर पाऊस असताना नाशिक जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. इगतपुरी येथील कावनई किल्ल्यावर दरड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने जीवितहानी टळली आहे. इगतपुरीतील वैतारणा, भातसा ही धरणे अद्याप 50 टक्के सुद्धा भरलेली नाहीत. मुंबईला या धरणातून पाणीपुरवठा केला जातो, दोन महिने उलटले तरी अद्यापही पाऊस फारसा झालेला दिसत नाही, तलाव भरलेले नाहीत. आपल्या जिल्ह्यात अनेक छोटे मोठे गडकिल्ले असून पावसाळ्यात सांभाळून गेले पाहिजे. पावसाचे आणि धबधब्यांची मजा घेण्यासाठी अनेक लोक गर्दी करतात, मात्र दुर्घटना घडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन यावेळी छगन भुजबळ यांनी केले.


काझी गढीबाबत उपाययोजना करा 


तर दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी सप्तशृंगी वणी गडाजवळील मार्कंडेय पर्वतावर दरड कोसळल्याची घटना घडली. यात एक भाविक जखमी झाल्याचे समजते. यावर ते म्हणाले की मार्कंडेय डोंगरावर अनेकदा गर्दी पाहायला मिळते. त्या दिवशीही गर्दी झाले हे चित्र होते, सुदैवाने काही घडले नाही, पण खबरदारी घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. तसेच नाशिकच्या काझी गढीबाबत ते म्हणाले की, "काही वर्षांपूर्वी काझी गढीचा काही भाग कोसळला होता, घर कधीही कोसळू शकतात. यासाठी मनपा प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे." धोकादायक परिस्थिती असल्याने लवकरात लवकर उपाय योजना करण्याचे भुजबळांनी सांगितले.


ठाकरे यांचा दौरा कसा असणार?


आदित्य ठाकरे हे आज नाशिकमध्ये साडेदहा वाजेपर्यंत पोहोचतील. सुरुवातीलाच ते शिवसेनेच्या नेत्या निर्मला गावित यांच्या घरी सांत्वन पर भेट देणार आहेत. निर्मला गावित यांचे चिरंजीव हर्षल गावित यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे हे गावित कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेणार आहेत. त्यानंतर आदित्य ठाकरे हे शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत. सातपूर येथील डेमोक्रसी हॉल येथे हा मेळावा पार पडणार आहे. त्यानंतर त्यानंतर आदित्य ठाकरे हे येवला कडे रवाना होणार आहेत. येवला शहरात देखील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून ते कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर, शरद पवारानंतर आदित्य ठाकरे भुजबळांच्या मतदारसंघात