नाशिक : अजित पवार (Ajit Pawar) गटाने शिंदे फडणवीस सरकारमध्ये एंट्री केल्यानंतर सर्व काही सुरळीत असताना पुन्हा एकदा नाशिकच्या राजकारणात (Nashik politics) चर्चेला उधाण देणारी बातमी समोर आली आहे. पालकमंत्री म्हणून दादा भुसे (Dada Bhuse) यांच्याकडे जबाबदारी असताना काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या पाश्वर्भूमीवर ना भुसे ना भुजबळ थेट मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना मान मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत चर्चाना उधाण आले आहे. 


देशाचा स्वातंत्र्य दिन (Indepedence Day) काही दिवसांवर येऊन ठेपला असून या कार्यक्रमासाठी राज्य सरकारकडून कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करणार त्याची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात पुन्हा एकदा गतवर्षीप्रमाणेच यंदादेखील नाशिकच्या ध्वजारोहणाचा मान ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना तर नाशिकचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांच्या हस्ते धुळ्याला ध्वजारोहण करण्यात येणार आहे. तर अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या हस्ते अमरावतीला ध्वजारोहण करण्यात येणार आहे. त्यामुळे एकीकडे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे असताना गिरीश महाजन यांना ध्वजारोहणाचा मान का देण्यात आला हे अद्याप गुलदस्त्यात आहे मात्र या निर्णयाने दादा भुसे यांच्या पाल्कमंत्री पदाबाबत सांशकता व्यक्त केली जात आहे. 


दरम्यान मागील वर्षी शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर गतवर्षीदेखील महाजन आणि भुसे यांनीच अनुक्रमे नाशिक आणि धुळ्यात ध्वजारोहण केले होते. त्यात गतवर्षी तर शिंदे फडणवीस सरकारचे पहिलेच ध्वजारोहण असल्याने गतवर्षापासूनच स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणाच्या मानाबाबतच्या चर्चेला प्रारंभ झाला आहे. यंदा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीचा अजित पवार गटही सहभागी झाल्याने छगन भुजबळदेखील यंदा ध्वजारोहण करणार आहेत. मात्र त्यांना थेट अमरावती जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात दोन मंत्री असल्याने गुलाबराव पाटील यांना जळगाव जिल्ह्यात ध्वजारोहणाचा मान देण्यात आल्याने तिथे महाजन यांना संधी मिळालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर महाजन हे जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी असतानाही त्यांना नाशिकची जबाबदारी पुन्हा देण्यात आली आहे. तर भुसे हे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही त्यांना धुळ्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे अर्थातच पुन्हा लवकरच पालकमंत्री पद बदलले जाणार का ? अशा चर्चेला प्रारंभ झाला आहे.


पालकमंत्री पद बदलणार का? 


राज्यातील मंत्र्यांना पालकमंत्री पदांचे वाटप 15 ऑगस्टपूर्वी केले जाईल, असे मानले जात असताना आता केवळ झेंडावंदनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना जिल्ह्यांचे वाटप केल्याने पालकमंत्रीपदाचे वाटप आणखी लांबणीवर पडले आहे. मंत्रिमंडळाचा अधिवेशनानंतर विस्तार केला जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. 4 ऑगस्टला अधिवेशन स्थगित झाले होते. तथापि, 15 ऑगस्टपूर्वी हा विस्तार होण्याची शक्यता नाही. त्यामुळे झेंडावंदनापुरते जिल्ह्यांचे वाटप मंत्र्यांना करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांना पालकमंत्रिपद मिळालेले नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अन्य बरेच मंत्री असे आहेत की ज्यांच्याकडे दोन ते तीन जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहे. त्यामुळे अनेक मंत्र्यांना पालकमंत्री पदही मिळालेले नसून आगामी मंत्री मंडळ विस्तारानंतर हा सुटणार असल्याचे दिसते. 


इतर महत्वाची बातमी :