Nashik Onion Rate : काही महिन्यांपासून कांदा दरात सातत्याने घसरण (Onion Rate) होत आहे. 'कांद्याला कोंब फुटले, मात्र सरकारला अजूनही जाग नाही'. नाशिक (NashiK) जिल्ह्यातील सटाणा येथील शेतकरी कलाकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) अनोख्या पद्धतीने निषेध केला असून कांद्यावर नरेंद्र मोदी यांच्या 20 मुद्रा चितारल्या आहेत. पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांसाठी पुरेसे काम करत नाहीत हे सांगण्यासाठी शेतकऱ्याने मेहनत घेवून ही बारीक कलाकुसर केली आहे. 


एकीकडे नाशिक जिल्ह्यात कांद्याची सर्वात मोठी कांदा बाजारपेठ (Onion Market) असून इथला अधिकाधिक शेतकरी कांद्याची लागवड करत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून कांद्याच्या भावात सातत्याने कमी अधिक फरकाने घसरण होत असताना शेतकरी मात्र अजूनही कांदा शेतीवर निर्भर आहे. असे असताना मात्र रात्रीचा दिवस करून पिकवलेला कांदा कवडीमोल भावात विकला जात आहे. शेती प्रश्नावर रान उठवणारे शरद जोशी (Sharad Joshi) आज हयात नाहीत. शेती प्रश्न कायम आहेत. नाशिकच्या कांदा उत्पादकांसमोर (Onion Farmers) मध्यप्रदेश आणि राजस्थान मध्ये होत असलेली कांद्याची विक्रमी लागवड हे मोठे आव्हान असणार आहे. तर दुसरीकडे मोठ्या आशेने ज्यांच्याकडे शेतकरी वर्ग पाहतो आहे, अशा पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील शेतकऱ्यांसाठी पुरेसे काम नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 


सटाणा (Satana) येथील शेतकऱ्याने सततच्या कांदा दरात होणाऱ्या घसरणीचा निषेध म्हणून जवळपास 20 कांद्यावर मोदींच्या वेगवगेळ्या रूपातील मुद्रा काढल्या आहेत. शेतकरी किरण मोरे म्हणतात कि, आजही कांदा रस्त्यावर आलेला आहे, कांदा उत्पादक शेतकरी वर्ग अपेक्षेने कांदा उत्पादन घेत असतो. मात्र आईंक वर्षांपासून जैसे थे परिस्थिती आहे. सध्या कांद्याला कोंब फुटले असून अजूनही सरकारला जाग आली नाही. मोदींनी मायबाप गरीब शेतकऱ्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांचं लक्ष आमच्याकडे वेधलं जावं, कांद्याकडे लक्ष वेधलं जावं त्यासाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांचे चित्र कांद्यावर चितारल्याचे मोरे यांनी सांगितले. 



दरम्यान शेतकरी किरण मोरे यांनी जवळपास अर्धा दिवस देऊन कांद्यावर प्रतिकृती साकारली आहे. यासाठी 25 कांद्यामधून एक निवडून त्यावर चित्र काढले आहे. मात्र आजही आमच्या, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. पण सरकारला अजून जाग येत नाही, मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे या माध्यमातून का होईना सरकारला, मोदींना जग येईल, कांद्याविषयी योग्य धोरण राबविण्यात येईल अशी आशा या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे. या शेतकऱ्याने वेगळा प्रयोग केला असून आपल्या देशाच्या पंतप्रधानापर्यंत हा प्रयोग पोहोचेल आणि त्यांचं कांदा विषयी जे धोरण आहे, त्यात काहीसा बदल होऊन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील, आशावाद महत्वाचा आहे. यापूर्वी देखील तीन कृषी कायदे आणताना बाजारातला हस्तक्षेप कमीत कमी राहील, शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळेल, पण तसं काही झालेलं नाही, शेतकरी आहे तिथेच आहे. याचसाठी नाशिकच्या शेतकऱ्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अनोखा प्रयोग राबविला आहे.