Nashik Raj Thackeray : 'शंभर वर्षे जुनी परंपरा मोडीत काढू नये, त्र्यंबकेश्वरमधील (Trimbakeshwer) प्रथा थांबवणे योग्य नाही'. त्याचबरोबर बाहेरच्यांनी यात पडायचं काय कारण नाही. गावच्या लोकांनी हा निर्णय घ्यायचा आहे. या माध्यमातून कुणाला दंगली हव्या आहेत का? ज्या गोष्टी चुकीच्या घडतील, तिकडे प्रहार करणे गरजेचे असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सांगितले. 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून दोन दिवसीय नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. राज ठाकरे यांनी त्र्यंबकेश्वरच्या (Trimbakeshwer Mandir) घटनेचा निषेध करत स्थानिक गावकऱ्यांनी याबाबत निर्णय घेणे महत्वाचे आहे. जर संदलची प्रथा शंभर वर्षे जुनी असेल तर ती मोडीत काढू नये, किंवा बंद करु नये, शांततेच्या मार्गाने हा प्रश्न सोडवण्यात यावा. महत्वाचे म्हणजे गावचा विषय असल्याने इतरांनी यात पडायचं काही काम नाही असल्याचा सूचक इशारा देखील यावेळी राज ठाकरे यांनी दिला. 


'या गोष्टींना सोशल मीडिया कारणीभूत'


यावेळी राज ठाकरे म्हणाले की, त्र्यंबकेश्वरची प्रथा जुनी आहे, असे समजते. धूप दाखवण्याची परंपरा आहे, त्यांनी धूप दाखवण्याचा प्रयत्न केला. मग एवढा गदारोळ कसा झाला? आपला धर्म एवढा कमकुवत आहे का कोणी आल्याने काही फरक पडतो. या माध्यमातून कोणाला दंगली हव्या आहेत का? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला. हा गावकऱ्यांचा विषय आहे, त्यामुळे गावकऱ्यांनी एकत्र येत यावर निर्णय घेणे अपेक्षित आहे. या सर्व गोष्टीना सोशल मीडिया कारणीभूत असून त्यावर या गोष्टी पाहिल्या जातात. त्यातून गैरसमज पसरवले जातात. महाराष्ट्र पोलिसांना 48 तास द्या, दंगलीच्या घटना घडणार नाही, असे सूचक विधान राज ठाकरे यांनी यावेळी केले. 


'मराठी मुसलमानांच्या भागात दंगली होत नाही'


राज ठाकरे पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात अनेक मंदिरे मशीद आहेत, वर्षानुवर्षे हिंदू समाज मशिदींमध्ये जात असल्याची अनेक उदाहरणे आहेत. मी अनेक मशिदीमध्ये गेलो आहे. अनेक मुसलमान बांधव मंदिरात येतात. अनेक लोक शहरात आहेत, ते इथेच शिकलेत, इथेच लहानाचे मोठे झालेत. मराठीतून शिक्षण घेतलं. मराठीत बोलतात. मग अशा मराठी मुसलमानांच्या भागात दंगली होत नाहीत. या माध्यमातून कुणाला दंगली हव्या आहेत का? ज्या गोष्टी चुकीच्या घडतील, तिकडे प्रहार करणे गरजेचे आहे. जसे मागील वेळी लाऊडस्पीकर आणि समुद्रातील दर्ग्याच्या विषयीचा मुद्दा मांडला होता. भोंगे, माहीम दर्गा याविषयी बोलले पाहिजे, जे दिसते त्यावर बोलले पाहिजे. गड किल्ल्यांवरील दर्गे हटवलेच पाहिजेत. ज्यावेळी मी बोलतो, त्यावेळी तुमच्या लक्ष नसतं, असा टोलाही यावेळी राज ठाकरे यांनी लगावला.