Nashik News : नाशिक (Nashik) शहरातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी असून उद्या शनिवारी शहरातील महत्वाच्या ठिकाणी पाणी पुरवठा (Water Cut) बंद करण्यात येणार आहे. नाशिक महावितरण कंपनीकडून उद्या वीज उपकेंद्र आणि मुख्य वीज वाहिन्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी महानगरपालिकेच्या गंगापूर (Gangapur Dam) आणि मुकणे धरणातील उपसा केंद्रांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असून रविवारी सकाळी कमी दाबाने, कमी प्रमाणात पाणीपुरवठा होईल, असे पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे.


नाशिक शहरात सध्या उन्हाची तीव्र झळ नाशिककरांना सोसावी लागत आहे. त्यामुळे पाण्याचा वापर अधिक होत असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर गंगापूर धरण साठ्यातही घट झाली असल्याने प्रशासनांकडून पाणी वापराचे नियोजन करण्यात येत आहे. अशातच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुकणे धरणाच्या पंपिंग स्टेशनवरील सब स्टेशनच्या विद्युत कामासाठी शनिवारी वीज पुरवठा बंद राहणार आहे. वीज पुरवठा बंद राहणार असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम हाेण्याची शक्यता असते. त्यामुळे शनिवारी पाणीपूरवठा बंद (water supply) ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.


दरम्यान नाशिक मनपाच्या मुकणे धरण रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीचे रेमंड सबस्टेशन गोंदे येथून वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे. सदरचे सबस्टेशन मधील विद्युत विषयक करण्यात येत आहेत. यासाठी विज वितरण कंपनीमार्फत शनिवारी वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मनपाचे विल्होळी जलशुध्दीकरण केंद्र येथून होणारा पाणीपुरवठा करता येणे शक्य होणार नाही. तसेच मनपाचे गंगापूर धरण पंपींग स्टेशन येथून मनपाचे शिवाजीनगर, बाराबंगला, पंचवटी, निलगीरीबाग, गांधीनगर, नाशिक रोड या जलशुध्दीकरण केंद्रास पाणीपुरवठा करण्यात येतो. सदरचे जलशुध्दीकरण केंद्र व जलकुंभ व वितरण व्यवस्थेतील आवश्यक दुरुस्तीची कामे करणे गरजेचे असल्याने गंगापूर धरण पंपींग स्टेशन येथून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे.


मनपाचे नागरिकांना आवाहन 


सबब सदर दोन्हीही ठिकाणाहून होणारा पाणीपुरवठा शनिवारी बंद ठेवून दुरुस्ती कामे करता येणे शक्य होणार आहे. तरी मनपाच्या गंगापुर धरण वॉटर पंपिंग स्टेशन आणि मुकणे धरण पंपींग स्टेशन येथून संपूर्ण शहरास होणारा शनिवार रोजीचा पाणीपुरवठा होणार नाही. तसेच रविवार रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे अशी विनंती मनपाचे अधीक्षक अभियंता (यांत्रिकी) यांनी केली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा, पाण्याचा अपव्य टाळावा, पाणी जपून वापरावे, असे आवाहन मनपाकडून करण्यात आले आहे.