Nashik Rain : गेल्या पाच दिवसांपासून त्र्यंबकेश्वर, (Trimbakeshwer) इगतपुरी (Igatpuri) आणि दिंडोरी तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने दारणा, गंगापूर (Gangapur) आणि पालखेड धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग करण्यात येत आहे आणि याचमुळे निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर (NandurMadhyameshwer) धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर नांदूरमध्यमेश्वर धरणातून सुमारे 44 हजार क्युसेकने  विसर्ग करण्यात येत आहे. 


गेल्या चार-पाच दिवसांपासून नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्याला पावसाने (Rain) झोडपून काढले आहे. नाशिकच्या पश्चिम पट्टा असलेला इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तसेच सुरगाणा पेठ, दिंडोरी या भागात विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे गंगापूर, पालखेड, वाघाड, ओझरखेड, दारणा, मुकणे, आदी धरणाच्या साठ्यात झपाट्याने वाढ झालेली आहे. तसेच गंगापूर, दारणा या धरणातून विसर्गही करण्यात येत आहे. तर नांदूरमध्यमेश्वर धरणातून काल रात्री 80 हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला होता. त्यानंतर आज सकाळी 65272 क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. तर दुपारी बारा वाजेनंतर हा विसर्ग घटवून 44768 इतका करण्यात आला आहे. सद्यस्थितीत नांदूरमध्यमेश्वर धरणांतून  44768 विसर्ग करण्यात येत आहे. 


मागील 24 तासात जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पेठ तालुक्यात 328 तर सुरगाणात 289 मिलिमीटर पावसाने नोंद करण्यात आली तर इगतपुरी, त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाचा जोर काहीसा कमी राहिला असला तरी आजही या तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. तर दिंडोरीत 172 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या ठिकाणी अनुक्रमे 131 व 90 मिलिमीटर पाऊस झाला तर कळवण 139, चांदवड 78, निफाड 76, नाशिक 70, बागलाण 69, देवळा 73, येवला 41 मिलिमीटर पाऊस झाला. तुलनेत मालेगाव 37 सिन्नर 24 नांदगाव 22 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. 


०९ टीएमसीहुन अधिक विसर्ग 
गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात येत असल्याने गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे गोदावरीत तिसऱ्या दिवशीही पूर परिस्थिती कायम आहे. गोदावरीत आलेल्या पुरामुळे दरवर्षी चांदोरी, सायखेडा आदी नदी काठच्या गावांना पुराचा फटका बसतो. यंदाही चांदोरी सायखेडा परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नांदूरमध्यमेश्वर काल रात्री 80 हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला होता. त्यानंतर आज सकाळी 65272 क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. तर दुपारी बारा वाजेनंतर हा विसर्ग घटवून 44768 इतका करण्यात आला आहे. सद्यस्थितीत नांदूरमध्यमेश्वर धरणांतून  44768 विसर्ग करण्यात येत आहे. तर यंदाच्या हंगामातील 80 हजार उच्चांकी पूर पाण्याचा विसर्ग करण्यात करण्यात आला होता. या पावसाच्या हंगामातील मंगळवार सायंकाळपर्यंत नऊ टीएमसी हून अधिक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे. 


पुराच्या पाण्यात पानवेली 
दारणा आणि गंगापूर धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. या पुराच्या पाण्यात पानवेली मोठ्या प्रमाणात वाहून आल्यामुळे सायखेडा रस्त्यावरील गोदावरी नदीच्या पुलाला पानवेली अडकल्या आहेत. परिणामी सदर ठिकाणी पाण्याचा फुगवटा निर्माण झाला असून पुराचे पाणी परिसरातील शेतांमध्ये घुसले आहे. यामुळे शेतीचे आणि पिकाचे मोठे नुकसान देखील झाले आहे. सध्या पोकलेनच्या मदतीने पूर पाण्यातून पानवेली काढण्यात येत आहेत. गंगापूर आणि दारणा पालखेड धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने नांदूर मधमेश्वर धरणाचे आठ वक्राकार गेट पूर्णच उघडून देण्यात आले आहेत.