Nashik Aditya Thackeray : राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, या सरकारमध्ये सर्व आमदारांना केवळ गाजर दिले आहे, तुला मंत्री करतो, तुला मंत्री करणारच असं  सांगितलं जात आहे. हे महाराष्ट्राचे सरकार आहे की दिल्लीश्वरांचे सरकार हेच कळत नाही, असा टोला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)  यांनी शिंदे गटाला लगावला आहे. 


युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा (shivsamvad Yatra) सातवा टप्पा आजपासून सुरू झालेला आहे चार दिवसांची ही शिव संवाद यात्रा असणारे नाशिक (Nashik) औरंगाबाद, जालना आणि बीड या जिल्ह्यांमधून ही शिवसंवाद यात्रा जाणार आहे. या आधी देखील आदित्य ठाकरे यांनी शिव संवाद यात्रा काढत राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन पक्ष बांधणी केली होती. आता शिवसंवाद’ यात्रेचा दुसरा टप्पात नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी (Igatpuri) मतदारसंघातील मुंढेगाव येथून संवाद कार्यक्रमास सुरुवात झाली, यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते.


यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले कि, शिवसंवाद दौऱ्यातही अनेक ग्रामपंचायतींना भेटणार आहे. या माध्यमातून लोकांच्या समस्या जवळून अनुभवयाला मिळतात. गद्दार गँगने सरकार पाडल्यानंतर गावागावात जाऊन लोकांशी बोलत आहे. 50 लोक असले तरी मी बोलणार असून तिकडे 50 कोटीचा खर्च झाला पण त्यांच्याकडे 50 लोक येत नाही. हे सरकार जास्त दिवस टिकत नाही. एका माणसाच्या राक्षसी महत्वकांक्षेने ही वेळ आली आहे. गद्दारच सरकार होर्डिंग्जवाल्यांची कर्ज मुक्ती करत आहे, बाकी कुणाची नाही. हे सरकार इकडेतिकडे फिरत आहे, मात्र लोकांना काही मिळत नाही.  अशी अनेक गावं आहे, जिथे रस्ते नाही डोल्या मधून दळणवळण नाही. आजूबाजूला समृध्दी आली, पण गावात पाणी नाही. मुंबई महापालिकेसाठी पाण्यासाठी आम्ही इथे धरण बांधले. पण आज याच लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याची खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. 


ते पुढे म्हणाले, या मुंढेगावात काही दिवसांपूर्वी भीषण आगीची घटना घडली. काय काय नुकसान झालं, यावर लवकरच भेट देऊन तपासणी करण्यात येईल, त्यानंतर अहवाल तयार करण्यात येईल. त्याचबरोबर हा प्रश्न देखील सभागृहात उपस्थित केला जाईल. दुसरीकडे मुख्यमंत्री दिल्ली जात आहेत, मात्र लोकांसाठी काही मागत नाही, फक्त स्वतःसाठी जात आहेत. हे सरकार अल्पकाळासाठीअसून लवकरच पडणार आहे, लिहून ठेवा, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. दोन गट झाले, वैगरे नाही, जे गेले ते गद्दार आहे. आम्ही संपूर्ण महाराष्ट्र आमचा समजत होतो. त्याच वेळी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. दावोसला गेल्यानंतर चाळीस कोटींचा खर्च करण्यात आला. मात्र त्याचा 4 कोटींचा फायदा नाही. हे मंत्री मंडळ पडणार असून याचा विस्तार पण होणार नाही. फक्त गाजर देऊन ठेवत आहे. शिवाय एक महिला या मंत्रिमंडळात नाही. या गद्दारानी सरकार पाडल, पण आम्ही फिरणार, मात्र माझ्याकडे द्यायला खोके नाही, फक्त शब्द आहे, तो मी देतो. 


मंत्रिमंडळात एकही महिला नाही.... 


चांगला प्रतिसाद मिळत आहेत. लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. सध्याची परिस्थिती बघितली तर एका माणसाच्या राजकीय महत्त्वकांक्षासाठी महाराष्ट्र मागे चालला आहे. सत्ताधाऱ्यांसाठी राजकीय परिस्थिती चांगली नसल्यामुळे निवडणुका घेत नाही. अनेकदा लोक भेटतात आणि सांगतात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंसारखा नेताच महाराष्ट्राला मिळाला नाही. राज्यात अनेक नवे उद्योग आणले, त्यामध्ये 80 रोजगार स्थानिक तरुणांना द्यावा लागणारी असे आपले सरकार असताना नियम केला. यासह राज्याचे मंत्रिमंडळात एकही महिला नाही. हे सरकार कोसळणारच आहे. हे महाराष्ट्राचे सरकार आहे की दिल्लीश्वरांचे सरकार आहे, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.