Nashik Accident : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात आणि विभागात सातत्याने अपघातांच्या (Accident) घटना समोर येत आहेत. मागील वर्षभरात नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये  जवळपास अडीच हजाराहून अधिक अपघात झाले. या अपघातात किमान 20 टक्के अपघात हे हिट अँड रनचे (Hit and Run) असल्याचे समोर आले आहे. हिट अँड रन म्हणजे काय तर अपघातानंतर पळून गेलेला अज्ञात वाहनधारक. 


देशभरात रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसागणिक वाढतेच आहे. यातही जीवघेण्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. रस्त्यावर बेदरकारपणे गाडी चालवून पादचाऱ्याला धडक देऊन पळून जाण्याचे प्रकारही सातत्याने वाढत आहे. अशा अपघातात निरपराधी पादचाऱ्यांचे हकनाक बळी जात आहेत, मोठ्या प्रमाणावर लोक जखमी होत आहेत. नाशिक जिल्ह्यासह जळगाव, धुळे, नंदुरबार,या अहमदनगर जिल्ह्यातही हे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले. गेल्या वर्षभरात म्हणजेच 2022 मध्ये जवळपास 2,700 अपघात घडल्याचे प्रकार समोर आले. यापैकी 20 टक्के अपघात हिट अँड रनचे असल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील यांनी सांगितले.


रस्त्यावर वाहनांची संख्या वाढत असल्याने अपघातात सातत्याने वाढ होत आहे. बहुतेक अपघात हे रस्त्यांवरील हिट-अँड-रन प्रकरणे आहेत. जेथे प्रामुख्याने वाहनांची वर्दळ कमी असते आणि अपघातानंतर वाहनचालकांना घटनास्थळावरून पळून जाण्यास अधिक वाव असतो. 2021 मध्ये या उत्तर महाराष्ट्रात 2 हजार 530 जीवघेणे अपघात झाले. हीच बाब लक्षात घेऊन हिट अँड रन प्रकरणातील आरोपींना अटक करून न्यायालयात खटला चालवला जाईल, याची काळजी घेण्याच्या सूचना धुळे, नंदुरबार, जळगाव अशा पाच पोलिस युनिटच्या पोलिस अधीक्षकांना दिल्या आहेत. 


दरम्यान आतापर्यंत पोलिसांनी 2 हजार 120 अपघात शोधण्यात यश आले, तर 16 टक्के प्रकरणे अद्यापही सापडली नाहीत. कारण चालक पळून जाण्यात यशस्वी झाले. 2022 मध्ये नोव्हेंबरच्या अखेरीपर्यंत, नाशिक ग्रामीण, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबारचा समावेश असलेल्या या जिल्हयांत  2 हजार 521 प्राणघातक अपघातांची नोंद झाली आहे. त्यापैकी 2 हजार 16 या पघातांमध्ये दोन्ही वाहनधारक मुळीं आले, तर 20 टक्के अपघातांमध्ये वाहनधारक पळून जाण्यात यशस्वी ठरले. बीजी शेखर पाटील यांनी तपासात न सापडलेल्या हिट अँड रन प्रकरणांचा शोध घ्यावा आणि पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना अशा प्रकरणांचा शोध घेण्याचे काम देण्याच्या सूचना दिल्या. हिट अँड रन प्रकरणांमध्ये गुंतलेले वाहनचालक कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी घटनास्थळावरून पळून जातात. यामुळे अपघातग्रस्त व्यक्ती रस्त्यावर पडून राहिल्याने, वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आता कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.